गोरेगाव सभेत राज ठाकरे म्हणतात, ‘ब्लू फिल्म काढली असती, तर लोकांनी पाहिली तरी असती’
वाचा राज ठाकरेंच्या १७ मिनिटांच्या भाषणातील सर्व मुद्दे!
राज ठाकरेंनी अवघ्या १७ मिनिटांमध्ये आपली पहिली प्रचारसभा संपवली. त्यामध्ये कोणताही व्हिडिओ न दाखवता त्यांनी भाषण आटोपतं घेतलं. इतक्या कमी वेळात संपलेलं त्यांचं हे सर्वात कमी वेळाचं भाषण आहे.
इथले उमेदवार अखिल चित्रे हे उगाच बुटाला पॉलिश करून आणि एवढीशी दाढी वाढवून फिरत नाहीत. ते तरूण आहेत. त्यांच्यात तडफ आहे या सरकारला जाब विचारण्याची. – राज ठाकरे
कुणीतरी उठतं आणि आमच्या सणांवर बंदी आणतं. दहीहंडी करू नका, गणपतीत आवाज करू नका, फटाके फोडू नका. आणि हे सगळं महाराष्ट्रात होतं. ज्या ज्या वेळी अशी बंदी आली, मनसेनं आवाज उठवला आहे आणि सण साजरे झाले आहेत. – राज ठाकरे
या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मी भूमिका घेतोय. पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्या १८ ते १९ सभा आहेत. या विधानसभेला मी तुमच्यासमोर एक मागणं घालायला आलो आहे. ते म्हणजे, या राज्याला सर्वार्थाने ज्याची गरज आहे, ती एका कणखर, सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. सत्तेतला आमदार काही करू शकत नाही. विरोधी पक्षातला आमदार तुमच्या मनातली खदखद मांडू शकतो. विरोधी पक्षाचा नेता, आमदार आश्वासनांचा जाब विचारू शकतो. तो या सरकारला नामोहरम करू शकतो. जेव्हा माझ्या आवाक्यात सत्ता असेल, तेव्हा मी सत्तेसाठी तुमच्याकडे येईन. पण आज मी तुमच्याकडे विरोधी पक्षासाठी तुमच्याकडे आलोय. अशी कुणी मागणी केली असेल, असं मला वाटत नाही. म्हणून आज राज्याच्या नागरिकांची गरज आहे ती सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्यांची आहे. सत्ताधाऱ्यांच्या अंगावर जाणाऱ्यांची आहे. – राज ठाकरे
तरूणांना नोकऱ्या लावण्याची आश्वासनं दिली होती, त्याचं काय झालं. रोजगार असणाऱ्याचा रोजगार जातोय, बेरोजगारांना रोजगार मिळत नाही. हे पुढारलेलं महाराष्ट्र राज्य अधोगतीला जात आहे. – राज ठाकरे