ख्यातनाम अभिनेते मास्टर विनायक

ख्यातनाम अभिनेते मास्टर विनायक

विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा आज स्मृतिदिन. मास्टर विनायक हे ख्यातनाम मराठी अभिनेते, दिग्दर्शक व निर्माता होते. त्यांचा जन्म १९ जानेवारी १९०६ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण येथेच झाले. पिंडाचे कलावंत असूनही विनायकरावांना कोल्हापूरच्या विद्यापीठात परिस्थितीमुळे काही काळ शिक्षकाची नोकरी करावी लागली. ते चित्रपटसृष्टीकडे वळले ते प्रथम ‘अयोध्येचा राजा’ (१९३२) या प्रभातच्या हिंदी-मराठी चित्रपटात नारदाच्या भूमिकेतून. विनायकरावांनी प्रभात फिल्म कंपनीच्या ५ चित्रपटांत भूमिका केल्या. त्यानंतर प्रभात कंपनीचे पुण्यात स्थलांतर झाले; त्यामुळे विनायकरावांनी कोल्हापूर सिनेटोनमध्ये प्रवेश केला. विनायकरावांना दिग्दर्शनाची पहिली संधी येथेच मिळाली. ‘विलासी ईश्वर’ (१९३५) याचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यानंतर बाबूराव पेंढारकरांनी विनायकराव आणि पांडुरंग नाईक यांच्या भागीदारीतील ‘हंस पिक्चर्स’ ची स्थापना केली.

हंस पिक्चर्सची चार वर्षे म्हणजे अभिनेता आणि दिग्दर्शक या नात्याने विनायकरावांच्या आयुष्यातील सुवर्णकाळच म्हटला पाहिजे. विनायकरावांनी हंस पिक्चर्सकरिता दिग्दर्शित केलेले सर्व चित्रपट ‘ज्वाला’ (१९३८) सोडून सामाजिक होते. त्यात ‘छाया’ (१९३६) सारखे गंभीर व सामाजिक समस्यांना स्पर्श करणारे आणि कारुण्याने ओथंबलेले चित्रपट जसे होते, तसेच ‘ब्रह्मचारी’ (१९३८), ‘ब्रँडीची बाटली’ (१९३९) यांसारखे हास्यरसप्रधान चित्रपटही होते. हंस पिक्चर्सच्या कारकीर्दीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सल्ल्याने पडद्यावरील इंग्रजी श्रेयनामावलीचे संपूर्णतः मराठीकरण प्रथम विनायकरावांनीच केले.

हंस पिक्चर्स बंद झाल्यावर १९४० मध्ये विनायकराव नवयुग चित्रपट संस्थेत गेले. तेथेही त्यांनी ‘लग्न पहावे करून’ (१९४०), ‘अमृत’ (१९४१), ‘सरकारी पाहुणे’(१९४२) असे लक्षात राहणारे चित्रपट दिग्दर्शित केले. १९४३ मध्ये त्यांनी आपली स्वतःची प्रफुल्ल पिक्चर्स ही संस्था स्थापन केली. ‘माझं बाळ’ (१९४३) हा प्रफुल्लचा चित्रपट म्हणजे विनायकरावांमधील प्रतिभाशाली कलावंताचे दर्शन घडविणारा होता. अशा या प्रतिभाशाली कलावंताचे १९ ऑगस्ट १९४७ रोजी निधन झाले.

First Published on: August 19, 2022 1:16 AM
Exit mobile version