‘खान’ नावामुळेच त्याला त्रास दिला जातोय- महबूबा मुफ्ती

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी उडी घेतली आहे. चार शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी केंद्रीय संस्था २३ वर्षाच्या मुलाच्या मागे लागल्या आहेत. कारण त्याचे आडनाव खान आहे. असा हल्लाबोल करत मुफ्ती यांनी आर्यन खान प्रकरणाला धर्मिक वळण देण्याबरोबरच एनसीबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभारले आहे.

तसेच ही न्यायाची थट्टा असून भाजपाकडून जाणीवपूर्वक मु्स्लिमांना टार्गेट केले जात आहे. असेही मुफ्ती यांनी म्हटले आहे. बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील क्रूझ रेव्ह  पार्टीप्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या आर्यन न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र याच मुद्दयावरून राजकीय वातावरण तापले आहे. एनसीपीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी याप्रकरणात आर्यन खानच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उभारत एनसीबीवरच आरोप केले. यामुळे एनसीबीला त्यावर स्पष्टीकरणही द्यावे लागले होते. यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरोपींच्या धर्मावरून राजकारण पेटले आहे. याचपार्श्वभूमीवर मुफ्ती यांनीही भाजपला लक्ष्य केलं आहे . केवळ आर्यनच्या नावापुढे खान असल्याने त्या २३ वर्षीय मुलाला नाहक त्रास देण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर एकीकडे शेतकरी आंदोलनात गाडी घुसवून ४ शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी सरकारी यंत्रणा त्या २३ वर्षाच्या मुलाच्या मागे लागल्या आहेत. कारण त्याच्या नावापुढे खान आहे. न्यायाची ही थट्टा आहे. असेही मुफ्ती यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

First Published on: October 11, 2021 4:00 PM
Exit mobile version