महाराष्ट्रात धनुष्य बाण निशाणी असलेल्या शिवसेना पक्षाने भाजपसोबत असणारी युती तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या तिन्ही पक्षांच्या महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि भाजपचे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भंगले. महाराष्ट्राप्रमाणेच आता झारखंडमध्ये देखील भाजपचे सत्तेचे स्वप्न भंगले आहे. यावेळी देखील झारखंडमध्ये धनुष्य बाणानेच कमळाचा पराभव केला आहे. मात्र, हा धनुष्य बाण झारखंडमधला झारखंड मुक्की मोर्चा पक्षाचे चिन्ह आहे.
काय आहे निकालाची आकडेवारी?
आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार ३० जागांवर झारखंड मुक्ती मोर्चाला यश आले आहे. तर त्याचा मित्र पक्ष काँग्रेसला १६ जागांवर यश मिळाले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील आघाडीचा राष्ट्रवादी पक्षाला देखील एका जागेवर यश मिळाले आहे. याशिवाय आरजेडीलाही एका जागेवर यश आले आहे. त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांच्या बाजूने स्पष्ट जनादेश असून त्यांचे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. भाजपला या निवडणुकीत फक्त २५ जागांवर यश आले आहे. त्यामुळे भाजपचे सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पूर्णपणे भंगले आहे.
हेही वाचा – जे काम शत्रूंनी नाही केले ते मोदींनी केले – राहुल गांधी
झारखंडमध्ये ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत पाच टप्प्यांत मतदान झाले. या मतदानाची सोमवारी मतमोजणी झाली. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी आघाडीला ४८ जागांवर विजय मिळला आहे. सन २०१४ मध्ये आजसू, जेडीयू आणि एलजेपी या पक्षांसोबत आघाडी करत निवडणूक लढवणारा भाजप यावेळी ’मात्र एकला चलो रे’ची भूमिका घेत स्वबळावर निवडणुकीत उतरला होता. हे पाहता भारतीय जनता पक्षाची ही निवडणूक एक प्रकारे अग्निपरीक्षाच होती. त्यात भाजपला यश आले नाही.