राहुल गांधींना खासदारकीपासून ‘मुक्ती’ मिळाली; भाजपचा खोचक टोला

राहुल गांधींना खासदारकीपासून ‘मुक्ती’ मिळाली; भाजपचा खोचक टोला

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर भाजपने यावर आपली भूमिका स्पष्ट करत राहुल गांधींना खोचक टोला लगावला आहे.

काॅंग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काॅंग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. आता भाजपने यावर आपली भूमिका स्पष्ट करत राहुल गांधींना खोचक टोला लगावला आहे. भाजप पक्षाचे मानव संसाधन विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत काॅंग्रेसकडून करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांना खासदार असणं म्हणजे दुर्दैव वाटत होतं, त्यांनी एकदा तसं बोलून दाखवलं होतं, त्यामुळे आता त्यांना खासदारकीतून मुक्ती मिळाली, असा खोचक टोला ठाकूर यांनी यावेळी लगावला.

भाजपचे मानव संसाधन विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, गुरुवारी जेव्हा सुरत सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली तेव्हा ज्येष्ठ वकिल कपील सिब्बल यांनी म्हटले होते की, शिक्षा सुनावल्यानंतरच सदस्यता रद्द होते. असं असूनही मागच्या 24 तासांत राहुल गांधी न्यायालयात का गेले नाहीत? पवन खेरा यांना शिक्षा झाल्यानंतर ते लगेचच न्यायालयात गेले आणि त्यांनी रिलिफ मिळालं, मग मागच्या 24 तासांत राहुल गांधी न्यायालयात का गेले नाहीत? असा प्रश्न धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधी यांना केला.

काॅंग्रेस कुटुंबाला असं वाटतं की, त्यांच्यासाठी एक वेगळं आयपीसी असावं, न्यायाव्यवस्था असावी.  वंचित वर्गाला ते तुच्छ दाखवतात. हे कुटुंब स्वत:ला न्यायव्यवस्थेहून ही उच्च समजतं. गांधी परिवाराला आपल्यासाठी एक वेगळी न्यायव्यवस्था असावी, असे वाटते. भाजप याची निंदा करते, असे धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: “मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं”; खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया )

खासदारकी रद्द झाल्याने वायनाडच्या लोकांची झाली सुटका

भाजपचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन टोला लगावला आहे. अनुराग ठाकूर म्हणाले की, भगवान के घर में अंधेर है, देर नहीं. राहुल गांधी म्हणायचे दुर्दैवाने मी खासदार आहे. आज त्यांची खासदारकी गेली. खासदारकीतून त्यांना मुक्ती मिळाली. तसेच, वायनाडच्या जनतेचीही सुटका झाली. 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी कधीही अमेठीसाठी एक प्रश्न विचारला नाही. आतापर्यंत त्यांनी केवळ 21 डिबेट्समध्ये सहभाग घेतला आहे. 2018 ला लिखित माफी मागूनही त्यांनी 2019 ला खोटे आरोप, अभद्र भाषा, अपमान, मोदी आडनावावर आक्षेपार्ह वक्तव्य, चोर अशी वक्तव्ये केली आहेत.

First Published on: March 24, 2023 5:32 PM
Exit mobile version