तलावाकाठी फूलं तोडण्यासाठी गेली चिमुकली आणि…

तलावाकाठी फूलं तोडण्यासाठी गेली चिमुकली आणि…

उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील लक्सरच्या रायसी भागातील बाणगंगा येथे असणाऱ्या तलावाकाठी फुल तोडण्यासाठी गेलेल्या आठ वर्षांच्या मुलीवर मगरीने हल्ला केला. या तलावातील मगरीने चिमुकलीला तिच्या तोंडात पकडून खोल पाण्यात ओढले. याची माहिती मिळताच रायसी चौकी पोलिस व वनविभाग घटनास्थळी पोहोचले. यानंतर ग्रामस्थांसह कित्येक तासानंतर संघर्ष करून मुलीचा मृतदेह तलावातून शोधून बाहेर काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी आपल्या आजीसह शेतात गवत कापण्यासाठी गेली होती. दरम्यान, तिने तलावाच्या पाण्यात असलेली फुले तोडायला सुरुवात केली. दरम्यान, मगरीने मुलीवर हल्ला करून तिला पाण्यात ओढले. या लहान मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजी आणि आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान या धक्कादायक घटनेची माहिती पोलिस व वनविभागाला देण्यात आली.

या प्रकारानंतर प्रत्येकाने मुलीचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर तलावातील मुलीचा मृतदेह सापडला. मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबीय मोठ-मोठ्याने रडू लागले. मगरीच्या दातांनी चिमुकलीच्या हातावर खोल जखमा देखील झाल्याच्या सांगितले जात आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे. मगरींच्या हल्ल्यात कोणी ठार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ग्रामस्थांच्या मते, मगरीपासून मुक्त होण्यासाठी वनविभागाला अनेकवेळा विनंती करण्यात आली होती, परंतु त्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने आज हा प्रसंग घडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, वन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते असे म्हणाले की, पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा गंगा व इतर नद्यांच्या पाण्याची पातळी वाढते तेव्हा मगरी पाण्यासह वाहून लोक असलेल्या भागातील तलावांमध्ये शिरतात. पाणी कमी झाल्यावर मगरी तिथेच राहतात. या भागात मगरीशिवाय इतर कोणत्याही वन्यजीवांच्या माहितीवर त्वरित कारवाई केली जाते.


मुंबईकरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ महिन्यात होणार मुंबई ‘Unlock’?

First Published on: September 26, 2020 2:37 PM
Exit mobile version