भाजपच्या किसान संवाद कार्यक्रमात शेतकर्‍यांचा राडा

भाजपच्या किसान संवाद कार्यक्रमात शेतकर्‍यांचा राडा

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण येताना दिसत आहे. कारण हरियाणात भाजपच्या किसान संवाद कार्यक्रमात शेतकर्‍यांनी प्रचंड गोंधळ घातला. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर कार्यक्रम स्थळी येण्याआधी स्टेजची तसेच खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. हा राडा इतका वाढला की, अखेर पोलिसांना शेतकर्‍यांवर लाठीचार्ज करावा लागला.

हरियाणाच्या करनाल येथील कैमला गावात रविवारी (10 जानेवारी) भाजपकडून किसान संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे शेतकर्‍यांना संबोधित करणार होते. केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायद्यांचा किती फायदा आहे, याबाबत ते शेतकर्‍यांना माहिती देणार होते. मात्र, खट्टर कार्यक्रम स्थळी दाखल होण्याआधीच शेतकर्‍यांनी काळे झेंडे दाखवत भाजप सरकारचा विरोध केला. त्यांनी खट्टर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

या दरम्यान, पोलिसांनी शेतकर्‍यांची मनधरणी करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, शेतकरी ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर पोलिसांनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज केला. त्याचबरोबर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. गर्दी पांगावी यासाठी पोलिसांनी शेतकर्‍यांवर जलफवारे देखील केले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखेर खट्टर यांचा दौरा रद्द करण्यात आला.

First Published on: January 10, 2021 11:56 PM
Exit mobile version