नवी दिल्ली – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच देशातील काही राज्यातही पाऊस पडत आहे. दरम्यान, मान्सूनच्या परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणासह संपूर्ण पंजाब आणि चंदिगडमधून मान्सून परतला आहे. राजधानी दिल्लीतूनही मान्सून परतल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
देशात सध्या मान्सून माघारी फिरण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. वायव्य राजस्थान आणि गुरजारातमधील कच्छमधून मान्सून आधीच परतला आहे. अशातच, आता जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्लीतूनही मान्सून परतल्याने आता पावसाची शक्यता कमी आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे.
मराठवाड्यात पावसाची हजेरी –
मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. लातूर , परभणी , नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. कमी कालावधीत झालेल्या तुफान पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनसह इतरही पिकांचेही खूप नुकसान झाले आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे पीक घेतले जाते. यावर्षी सोयाबीन लागवडीपासूनच सतत होणारा पाऊस, शंख गोगलगाय, रोगराई असे संकट सुरु होते. यातून जी पिके वाचली त्यांना या पावसाचा फटका बसला. जोरदार वारे आणि विजेच्या कटकडाटासह झालेल्या पावसाने जीवितहानी देखील झाली आहे.