मोदींवर टीका करणं सोडा अन् काँग्रेसवर लक्ष द्या; पवारांचा राहुल गांधींना सल्ला

मोदींवर टीका करणं सोडा अन् काँग्रेसवर लक्ष द्या; पवारांचा राहुल गांधींना सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतात. यावर बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचं सोडून द्या आणि काँग्रेस वाढवण्यावर लक्ष द्या, असा सल्ला दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवारांनी राहुल गांधींना हा सल्ला दिला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मी काँग्रेसला पाहत आलो आहे. गांधीवाद ही काँग्रेसची मोठी ताकद आहे. तसं माझं निरीक्षण आहे. काँग्रेसमधील विविध गटांना एकत्रित आणण्यात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यशस्वी ठरल्या आहेत. दरम्यान, आता काँग्रेसनेही राहुल गांधींचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्याकडे संपूर्ण काँग्रेसची जबाबदारी सोपवण्यात आली पाहिजे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. मात्र, त्यांचा हा पक्षांतर्गत विषय आहे, असं देखील पवार म्हणाले.

राहुल गांधी यांनी काँग्रेसची धुरा कशी सांभाळावी? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले केवळ पक्ष सांभाळून चालणार नाही. तर पक्षातील विविध नेत्यांशीही राहुल गांधी यांनी सातत्याने संवाद साधायला हवा. राहुल गांधींनी पक्षातील सर्व नेत्यांना एकत्र आणायला हवं, असं शरद पवार म्हणाले. राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाचा दौरा करायला हवा. सर्व राज्यातील पार्टी कार्यकर्त्यांशी संवाद साधायला हवा. मागे त्यांनी असं केलं होतं. पुन्हा त्याची पुनरावृत्ती करायला हवी. पक्षातील कार्यकर्त्यांना उभारी देणं आणि त्यांना एकत्र आणणं खूप महत्त्वाचं आहे, असं शरद पवार म्हणाले. राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत, त्याविषयी विचारलं असता, खरं तर ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. पण तुम्ही जर एखाद्या व्यक्तिवर व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली तर तुमची विश्वासहार्यता कमी होते, असं माझं निरीक्षण आहे. त्यामुळे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत, असा सल्लाही शरद पवारांनी राहुल गांधींना दिला.

 

First Published on: July 30, 2020 4:03 PM
Exit mobile version