नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी केलेल्या ‘उठावा’मुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यातून शिवसेना अद्याप सावरलेली नसतानाच राजधानी दिल्लीतूनही शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 19पैकी 14 खासदार लोकसभेत स्वतंत्र गट करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते.
हिंदुत्वाच्या मद्द्यावर अस्वस्थ होऊन शिवसेनेते ‘उठाव’ केल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या गटाने केला आहे. त्याला महाराष्ट्रात स्तरातून पाठिंबा दिला जात आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली येथे शिवसेनेला याचा फटका बसला असून राज्यातील इतर भागातूनही शिंदे गटाचे समर्थन दिले जात आहे.
हेही वाचा – बंडखोरांवर कारवाई, तर निष्ठावंताचे शिवसेनेकडून कौतुक
हे लोण आता शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरही पोहोचण्याची चिन्हे आहेत. याचीच चाहूल लागल्याने शिवसेनेने पाचच दिवसांपूर्वी भावना गवळी (Bhavana Gawli) यांना लोकसभा प्रतोदपदावरून हटवून राजन विचारे (Rajan Vichare) यांची लोकसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र तरीही, 19पैकी 14 खासदार ‘उठाव’ करण्याच्या तयारीत असून स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्या, अशी विनंती ते येत्या दोन-तीन दिवसांत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रपती निवडणुकीतील भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमदेवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून ते शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावण्याची शक्यता आहे. अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन कीर्तिकर आणि संजय मंडलिक हे चौघे वगळता इतर खासदार शिंदे गटात सहभागी होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा – सर्वोच्च न्यायालय कुणाच्याही खिशात नाही, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका