स्मार्ट मीटरमुळे ग्राहक सेवेचा दर्जा वाढणार – विजय सिंघल

स्मार्ट मीटरमुळे ग्राहक सेवेचा दर्जा वाढणार – विजय सिंघल

स्मार्ट मीटरमुळे ग्राहक सेवेचा दर्जा वाढणार - विजय सिंघल

आज देशभरातील बहुतांश वीज कंपन्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकसेवेत सकारात्मक बदल करत आहेत. याचाच भाग म्हणून वीज वितरण कंपन्यांनी स्मार्ट मीटरचा वापर वाढवल्यास ग्राहक सेवेचा दर्जा वाढणार असून यामुळे ग्राहकांच्या वेळेत रिडींग घेणे, योग्य वीजबिल मिळणे या बाबतच्या तक्रारींना वाव राहणार नाही, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.

कॉन्फिड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री(सीआयआय) यांच्यामार्फत आयोजित स्मार्ट मीटर या विषयावरील ऑनलाईनद्वारे झालेल्या परिषदेत  सिंघल बोलत होते. पूर्ण देशभरात ‘स्मार्ट मीटर नॅशनल प्रोग्राम’ अंतर्गत वर्ष २०२३ पर्यंत २५ कोटी पारंपरिक मीटर बदलून त्याजागी स्मार्ट मीटर लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व त्यातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी सीआयआयमार्फत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सीआयआय ही संस्था पर्यावरण संवर्धनातून विकास याकरिता भारतात काम करते. या परिषदेत सीआयआय नॅशनल कमिटीचे सह अध्यक्ष डॉ. प्रवीर सिन्हा, आंध्रप्रदेशचे ऊर्जा सचिव श्रीकांत नागुलापल्ली, आसामचे प्रधान सचिव नीरज वर्मा, पंजाबचे प्रधान सचिव(ऊर्जा) वेणू प्रसाद, इंटेलिस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली.चे अध्यक्ष अनिल रावल, सेक्युअर मीटर लि.चे सुकेत सिंघल यांनीही आपला सहभाग नोंदवला होता.

यावेळी सिंघल पुढे म्हणाले, नेमका विजवापर लक्षात आल्याने ग्राहक वीज बचत करण्याबाबत अधिक जागरूक राहू शकतो. स्मार्ट मीटरमुळे वीज देयक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार आहेत. बिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्यास त्याचा फायदा ग्राहकांसोबतच वीज वितरण कंपन्यांनाही होणार आहे. ग्राहकांना वेळेत बिल भरण्याची सवय लागून, वीज कंपन्यांची थकबाकी कमी होण्यासाठीही स्मार्ट मीटरची मदत होणार आहे. एकूणच वीज कंपन्यांचा ताळेबंद सुधारण्यास स्मार्ट मीटरची मोठी मदत होणार आहे. याकरिता ग्राहकांकडून ही स्मार्ट मीटरचे सकारात्मक पद्धतीने स्वीकार अपेक्षित आहे. स्मार्ट मीटरकरिता केंद्र सरकार ही सकारात्मक पावले उचलत आहे. स्मार्ट मीटर निर्मिती कंपन्यांना उद्देशून बोलताना सिंघल म्हणाले, ग्रामीण भागात स्मार्ट मीटरबाबत कनेक्टिव्हिटीची अडचण येऊ शकते. याकरिता कंपन्यानी अधिक सुलभ तंत्रज्ञान विकसित करणे अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


हे ही वाचा – Air India Handover: एअर इंडियाची मालकी आजपासून टाटा समूहाच्या हाती


 

First Published on: January 27, 2022 8:21 PM
Exit mobile version