चारा घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचा जामीन अर्ज आज, बुधवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. लालू प्रसाद यादव यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून जामिनाची मागणी केली होती. मात्र कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर लालू प्रसाद यादव यांना कोर्टाच्या या निर्णयाचा झटका बसला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे राजदला यंदा प्रथमच लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय निवडणूकींना सामोरे जावे लागणार आहे. त्यातच लालू प्रसाद यादव यांच्या दोन मुलांमध्येही एकमत नसल्याचे समोर आले आहे.
Supreme Court dismisses RJD president Lalu Prasad Yadav's bail plea in three cases of the multi-crore fodder scam. pic.twitter.com/0BTgu7qj7F
— ANI (@ANI) April 10, 2019
निवडणुकीच्या प्रचारात गरज भासतेय
बिहारच्या जनतेला लालू प्रसाद यादव यांची प्रचारात कमतरता जाणवत आहे. त्यातच लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या जामिन अर्जावर सीबीआयने कोर्टाला सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून लालू प्रसाद यादव प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मग आताच कसे ते चांगले झालेत, तसेच ते निवडणूकीच्या प्रचारासाठी जामीन मागत आहेत, असे म्हटले आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात जर लालू प्रसाद यांना जामीन मिळाला तर, उच्च पदांवरील भ्रष्टाचार प्रकरणी चुकीची परंपरा पडेल. तसेच सीबीआयने असेही म्हटलंय की, गेल्या आठ महिन्यांपासून लालू प्रसाद यादव हे हॉस्पिटलमध्ये आहेत. मात्र तरीही ते इथूनच राजकारणाची सूत्रं हलवत आहेत. लालू प्रसाद यादव हे आपण खूप आजारी असल्याने कारागृहात राहू शकत नाही, असे म्हणतात. यासाठी त्यांना हॉस्पिटलच्या खास वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. असे असताना ते आरोग्याच्या दृष्टीने तंदरूस्त कसे काय झाले. त्यांना आताच का जामीन कसा काय हवा आहे. यावरून ते निवडणूक प्रचारासाठीच जामीन मागत असल्याचे म्हटले आहे.
मोठ्या मुलाने साथ सोडली
लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष दोन भागांमध्ये विभागला आहे. तर लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांनी ‘लालू-राबडी मोर्चा’ या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. यामुळे लालू यांच्या दोन पुत्रांच्या नात्यामधील कटुता चव्हाट्यावर आली आहे. सोबतच सारण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचेही जाहीर केले आहे. तसेच राजदने सारण लोकसभा मतदारसंघातून तेजप्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यामुळे नात्यामध्ये कटुता निर्माण झाली आहे.