आसाममध्ये पुराचा कहर, 24 जिल्ह्यांमध्ये २ लाख लोक बेघर, रेल्वे आणि रस्ते संपर्क ठप्प

आसाममध्ये पुराचा कहर, 24 जिल्ह्यांमध्ये २ लाख लोक बेघर, रेल्वे आणि रस्ते संपर्क ठप्प

आसाममध्ये आलेल्या पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. आसाममधील 24 जिल्ह्यांतील दोन लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. संततधार पावसामुळे भूस्खलन होऊन रेल्वे आणि रस्ते संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. त्याचवेळी पूर आणि भूस्खलनामुळे राज्यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे.

पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतर डोंगराळ जिल्हा दिमा हासाओ राज्याच्या इतर भागापासून तुटला आहे. येथे पुरामुळे रेल्वे मार्ग वाहून गेला. अनेक स्थानकांवर ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. डोंगराळ भागात भूस्खलनामुळे रुळांच्या खालची जमीन खचली आहे.  सतत चालू असलेल्या पावसामुळे लखीमपूर, नागाव, होजई जिल्ह्यात अनेक रस्ते, पुलांचे नुकसान झाले आहे. न्यू हाफलाँग रेल्वे स्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेले असून स्थानकावर उभी असलेली एक रिकामी ट्रेन पुरामुळे वाहून गेली. सुमारे 18 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 10 गाड्या मार्गावर थांबवण्यात आल्या आहेत. दळणवळण पूर्णपणे बंद असल्याचे आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले आहे. रुळांची दुरुस्ती करून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हाफलाँगकडे जाणारे सर्व रस्ते आणि रेल्वे मार्ग १५ मेपासून बंद आहेत.

अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे कचर जिल्ह्यात दोन मृत्यूची नोंद झाली आहे. तर दिमा हासाओमध्ये भूस्खलनामुळे तीन मृत्यू झाले आहेत. आसामधील 20 जिल्ह्यांतील 46 महसूल विभागातील एकूण 652 गावांना पुराचा फटका बसला आहेत. लोकांना दिलासा देण्यासाठी सात जिल्ह्यांमध्ये  55 मदत शिबिरे उघडण्यात आली असून, त्यामध्ये 32 हजार 959 लोकांना आश्रय देण्यात आला आहे. एनडीआरएफ, आर्मी, एसडीआरएफचे जवान पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहेत.

हवामान खात्याने केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांसह चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. इतर सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय अनेक भागात पुराचा इशाराही जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे कोट्टायममध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांना पूर आला आहे. वीजवाहिन्या तुटल्या असून पिके नष्ट झाली आहे.

First Published on: May 17, 2022 6:09 PM
Exit mobile version