सध्या सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या लग्नसराईची बातमी समोर येत असतानाच, ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील मुख्य कलाकार आणि प्रेक्षकांची लाडकी जोडी अंजली बाई आणि राणा दा आता खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी होणार असल्याची बातमी समोर येत आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला असून दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांचा साखरपुडा ३ मे रोजी ठाणे येथे पार पडला. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो बघताच चाहत्यांसह अनेक कलाकारांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.
अभिनेता हार्दिक जोशीने एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गुडघ्यावर बसून अक्षयाला अंगठी घालत आहे.
सध्या हार्दिक जोशी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून, अक्षया ‘हे तर काहीच नाय’ या कार्यक्रमात दिसून आली होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही या दोघांची पहिली मालिका होती.