ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है….

ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है….

ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया
ये इन्सां के दुश्मन समाजों की दुनिया
ये दौलत के भूखे रिवाजों की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है

गुरुदत्तचा प्यासा आठवतोय…आजच्या स्थितीचा विचार करता ही परिस्थिती कितीशी बदललीय…साहीरनं हे गाणं लिहलं तो काळ 1957 मध्ये साम्यवादी चळवळींनी जोर धरला होता. प्यासाचं कथानक गोरगरीबांच्या झोपडीतून दिसणारा भाकरीचा चंद्रच नाही, तर उपेक्षितांचं वाड्मय चौर्य करणा-या भांडवलवादी अमिर उमरावांच्या पांढरपेशी चेह-यावरचा नकाब हटवणारं होतं. कविता आणि गाण्यांचे शब्द मानवी जगण्याचा दस्ताऐवज म्हणून कागदावर उतरण्याचा हा काळ होता. गजलेच्या मार्गाने जाणा-या नज्म लिहण्यावर भर देणा-या काव्यकारांनी त्यावेळी विद्रोहालाही वाट मोकळी करून दिली. गाण्यांच्या तुलनेत कवितेला मानाचं स्थान देण्याच्या प्रयत्नात असणा-या साहिर लुधियानवीने हे प्रयत्न सुरूच ठेवले होते. यश चोप्रांच्या 1976 चा कभी कभी मध्ये त्याने पुन्हा कविता लिहली.

कभी कभी मेरे दिल में ख़याल आता है
कि ज़िंदगी तिरी जुल्फों कि नर्म छांव में गुज़रने पाती
तो शादाब हो भी सकती थी।

साहिरने नज्म, शेर लिहतानाच गझलेल्या आकृतीबंधातून कविता मुक्त केली. श्याम बेनेगलांच्या समांतर चित्रपटांची धुरा दिग्दर्शनातील त्यांचे असिस्टंट गोविंद निहलानींनी खांद्यावर घेतल्यावर अर्धसत्यची आखणी सुरू होती. दिलीप चित्रे यांची अर्धसत्य ही कविता या चित्रपटाचं बीज होतं.

एक पलड़े में नपुंसकता
एक पलड़े में पौरुष
और ठीक तराज़ू के काँटे पर
अर्ध-सत्य

हिंसा, गुन्हेगारी आणि समाज आणि राजकीय व्यवस्थेतील पोखरलेल्या पोकळ पुरुषार्थाची वस्तुस्थिती ओम पुरीच्या तडाखेबंद आवाजातून या कवितेतून वेशीवर टांगली. कविता बरंच काही सांगत होती. पण सिनेमात सांगण्यापेक्षा दाखवण्याला महत्व असल्याने न उलगडणारी कविता कमी होत गेली. 1990 मध्ये अमोल पालेकरांनी थोडासा रुमानी हो जाए बनवाना कवितेला पडद्यावर पुन्हा मानाचं पान बहाल केलं. नाना पाटेकरनं बारीश कवितेला पडद्यावर शब्दरुप दिलं होतं.

यह पानी आँख से ढलता है तो आँसू कहलाता है
लेकिन चेहरे पे चाड जाए तो रुबाब बन जाता है
कोई शर्म से पानी पानी हो जाता है
और कभी कभी यह पानी सरकारी फाइल’ओ में अपने कुएँ समेत चोरी हो जाता है

चित्रपटाचा विषय जरी नावातून बारीश किंवा रुमानी असला तरी कवितेच्या शेवटच्या ओळीत राजकीय व्यवस्थेतील लबाडीचा उल्लेखाची फाईल उघडण्यात पालेकर यशस्वी झाले. नानाला कवितेची गोडी आजही कायम आहे. म्हणूनच वजूदमध्ये त्याने पुन्हा, तुम नही जानती तुम मेरे लिए कौन हो…म्हणत कवितेला साद घातली.

जब्बार पटेल मुक्ता बनवत होते, यात पिडीत, दलित, शोषित चळवळीचा नायक अविनाश नारकर साकारणार होता. आंबेडकरी चळवळ म्हणजे कविता, विद्रोह साहित्य आणि विश्वव्यापी मानवतेचा विषय टाळता येणार नव्हता. नामदेव ढसाळांच्या जवळ जाणारी व्यक्तीरेखा मुक्तामध्ये नायकाची असल्याने ढसाळांच्या कवितेला पर्याय नव्हता.

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो
तूमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून&
मवाल्यासारखे माजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात
माणसं
चौकाचौकातून

ही कविता अविनाशने पडद्यावर नामदेव बनूनच साकारल्यावर ढसाळ त्याला म्हणाला, हा पडद्यावर मी होतो, असाच होतो. हिंदी पडद्यावरचा कवितेतील विद्रोहही संपलेला नव्हता, हरिवंशराय बच्चन यांच्या अग्नीपथ कवितेचं बीजही अर्धसत्य सारखंच मुकूल आनंदने याच नावाचा सिनेमा बनवून कथानकात रुजवलं,

यह महान दृश्य है,
चल रहा मनुष्य है,
अश्रु श्वेत रक्त से,
लथपथ लथपथ लथपथ,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।

अलिकडच्या काळात हिंदी पडद्यावर कविता पुन्हा नव्याने मिरवू लागली. जावेद अख्तर यांनी जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये पुन्हा कवितेला पडद्यावर घेतलं…

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम
नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम

आपल्या माणूस म्हणून जिवंत असण्यावरची अशी शंका अख्तर यांनी गेल्या दशकातील जागतीकीकरणाच्या परिणामानंतर व्यक्त केली होती. तर नुकत्याच येऊन गेलेल्या पिंक मध्येही कवि तनवीर गाज़ी यांनी स्वतःच्या अस्तित्वाविषयी जबरदस्त आशावाद कवितेतूनच व्यक्त केला.

तू खुद की खोज में निकल
तू किस लिए हताश है,
तू चल तेरे वजूद की
समय को भी तलाश है

यश चोप्रांच्या जब तक है जान मध्ये गुलजारांनी केलेली शब्दरचना चित्रपटाच्या कथानकाचा कुठलाही विषय नसताना सामाजिक व्यवस्थेतील फसवणुकीवरही भाष्य करणारी होती.

तेरे झूठे कसमों वादों से
तेरे जलते सुलगते ख्वाबों से
तेरी बेरहम दुवाओं से
नफ़रत करूँगा मैं
जब तक है जान
जब तक है जान

कवितेला हिंदी पडद्यानं अभावानेच स्थान दिलं गेलं, करणूक आणि शो बिझनेसच्या या चकाकत्या जगात अस्सल कविता अपवादानेच रमली. कवितेची या रुपेरी पडद्याच्या चकाकत्या जगात इथं घुसमट टाळली जाणार नव्हती. हिंदीत अनुभव सिन्हा आणि मराठीत नागराज मंजुळेने कवितेला पुन्हा पडद्यावर स्थान देण्याचे प्रयत्न सकारात्मक आहेत. पुस्तकाच्या पानातून बाहेर पडून चित्रपटाच्या पडद्यावरही कविता रुजायला रमायला हवी.

First Published on: January 3, 2021 4:14 AM
Exit mobile version