140 वर्षांपासूनची क्षयरोगाची दहशत आजही कायम; मुंबईत सर्वाधिक 65,617 रुग्ण

संग्रहित छायाचित्र

मुंबई : आपल्या आसपास खोकणाऱ्या व्यक्तीचा खोकला हा केवळ साधा खोकला आहे की, टीबीचा याचा आपण विचारही करत नाही. दरवर्षी चार लाखाहून अधिक नागरिकांचा जीव घेणारा टीबी म्हणेजच क्षयरोग आजही भारतीयांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जातो. परंतु, वेळेवर निदान आणि औषधोपचारांनी यावर आपण मात करू शकतो.

२४ मार्च १८८२ रोजी डॉ. रॉबर्ट कोच यांनी मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस, क्षयरोग (टीबी) कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध जाहीर केला, त्यावेळी युरोप व अमेरिकेमध्ये ७ पैकी १ नागरिक हा क्षयरोगामुळे मृत्युमुखी पडत होता. क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आले असले तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही म्हणजेच आज आपण १४० वर्षे या आजाराशी लढत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, जगभरात दर दिवशी ४००० लोकांचा मृत्यू क्षयरोगाने होतो. भारतात क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या मोठी असून आशियाई देशात भारताचा क्रमांक पहिला आहे.

देवी, कांजण्या, पोलिओ अशा रोगांवर नियंत्रण मिळवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. परंतु, अजूनही क्षयरोग अर्थात ट्यूबरक्यूलॉसिस (टीबी) हा आजार अजूनही भारतीयांचा कर्दनकाळ म्हणून वावरत आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज बोरिवली येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये नर्सेससाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत टीबीविषयी अधिक माहिती देताना बोरिवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे फुफ्फुसविकार तज्ञ डॉ. पार्थिव शहा म्हणाले की, “सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशात कोविडचे ७०२६ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ४६५० प्रकरणे फक्त या चार राज्यांमध्ये आहेत. म्हणजेच एकूण सक्रिय प्रकरणांपैकी ६६ टक्के प्रकरणे या राज्यांतील आहेत. यापैकी केरळ (१९२१) आणि महाराष्ट्र (१४८९) या दोन राज्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. गुजरात (९१६) आणि कर्नाटकमध्ये संसर्गाचे ६२४ सक्रिय रुग्ण आहेत. या चार राज्यांमध्ये कोविडचा सकारात्मकता दर अर्थात पॉजिटिव्हिटी रेटही वाढत आहे.

कोरोना संसर्गात आणि कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शरीरातील टीबीचे विषाणू ऍक्टिव्ह होतात. त्यामुळे, रुग्णांना टीबीचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. हा संसर्गजन्य आजार आहे. मायक्रोबॅक्टेरिअम ट्युबरक्युलोसिस नावाच्या सूक्ष्म जंतूंपासून हा रोग होतो. जगातील एकूण रुग्णांच्या एक चतुर्थांश टीबी पेशंटमध्ये थुंकीमधील संसर्गामुळे टीबी फैलावतो. एका वर्षात टीबीवर पूर्ण उपचार न घेतल्यास दहा ते पंधरा जणांना टीबीची लागण होते. त्यातील प्रामुख्याने ऐंशी टक्के टीबी हा फुफ्फुसांचा असतो. याव्यतिरिक्त ग्रंथी, हाडे, सांधे, मज्जासंस्था, जनन आणि विसर्जन संस्था, आतडे आणि इतर अवयवांनाही टीबीची लागण होऊ शकते.

कोरोना संसर्गात उपचारासाठी देण्यात येणाऱ्या स्टिरॉईड्समुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यामुळेच टीबी किंवा काळ्या बुरशीसारखे संधीसाधू आजार डोकं वर काढत आहेत. “मुंबई शहरात २०२२ साली सर्वाधिक टीबीचे रुग्ण आढळले आहेत. अशातच बीएमसीने टीबीचा प्रसार रोखण्यासाठी हाय-एंड जिनोमिक्स, जलद चाचण्या आणि बेड तसेच लॅबोरेट्रीजची संख्या वाढली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या टीबी रुग्णांच्या आकडेवारीवरून असे दिसून आले की, २०२२ मध्ये मुंबईत ६५६१७ प्रकरणे आढळून आली होती आणि सलग तिसऱ्या वर्षी यात महिला रुग्णांची संख्या जास्त होती. २८६२९ महिला आणि २७४५४ पुरुषांना टीबी झाल्याचे आढळून आले आहे. २०२० साली कोविड आल्यामुळे टीबीच्या उपचार व निदान प्रक्रियांवर परिणाम झाला होता, आता पुन्हा कोविड वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन अपेक्स हॉस्पिटल समूहाने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केले आहे.

First Published on: March 24, 2023 8:40 PM
Exit mobile version