राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. येत्या आर्थिक वर्षातील 2023 च्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करण्यात येणार आहे.
सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. याच योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री किसान योजना राबवत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. ही योजना लागू झाल्यास शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय ठरेल. या योजनेस पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक महिना टप्प्याटप्प्याने सहा हजार दिले जातात. प्रत्येक वर्षी सहा हजारांची ही मदत शेतकऱ्यांना दिली जात आहे.
मात्र महाराष्ट्रात ही योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे, याबाबतची माहिती स्पष्ट नाही, मात्र सरकार लवकरचं याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. परंतु अर्थसंकल्पात या योजनेसाठी किती रुपयांची तरतूद करण्यात येईल याबाबतची माहिती समोर आलेली नाही. तसेच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील याबाबतची माहितीही मिळालेली नाही. मागील अनेक दिवसांपासून कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मतदारांना वळवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.