कुणाचीही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही, अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा

कुणाचीही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही, अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेतून भोंग्यावरुन थेट ४ तारखेचा इशारा दिला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. परंतु त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. अशातच महाराष्ट्रामध्ये कुणीही काम करताना अल्टीमेटम दिल्यानंतरही कुणाचीही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना दिलाय.

अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये कुणीही काम करताना अल्टीमेटम दिल्यानंतरही कुणाचीही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही. कारण हे कायद्याचं राज्य आहे. कुणाला असं वाटत असेल की, मी असं बोललो की असं होईल. परंतु असं काहीही चालणार नाही. मग तो कुणीही असो. अजित पवारांनी पण हुकुमशाही केलेली चालणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

कायदा आणि नियमाने ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचं पालन सर्वांना करावं लागेल. सर्व पक्षाच्या नेत्यांना करावं लागेल. सर्व नागरिक आणि ग्रामस्थांना करावं लागेल, असं पवार म्हणाले.

…हा आग्रह मशिदींवरच्या भोंग्यांसाठी का नाही?

उत्तर प्रदेशमध्ये फक्त मशिदींवरचे भोंगे उतरवले गेले नाहीयेत. तिथं माझ्या माहितीप्रमाणे अयोध्येला की मथुरेला कुठेतरी पहाटेचा लाऊडस्पीकर लागायचा, तोही बंद झालाय. काल गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी सुद्धा सांगितलं होतं आणि दोन दिवसांपूर्वी मी सुद्धा बोललो होतो. काही जरी निर्णय झाला तरी तो निर्णय सर्वांना बंधनकारक राहणार आहे. फक्त मशिदींवरचे भोंगे काढायचे आणि इतर ठिकाणांचे भोंगे काढायचे नाही, असं कसं शक्य आहे, असं पवार म्हणाले.

कुणीही जर उद्या कोर्टामध्ये धाव घेतली. तर कोर्ट म्हणेल की, तुम्हाला सर्वांसाठी एकच नियम लावावा लागेल. कोर्टाने लाऊडस्पीकरच्या आवाजाबद्दल निर्णय घेतला आहे.

चिथावणीखोर भाषणांमुळे राज ठाकरेंवर कारवाईची मागणी?

राज ठाकरेंना सभेपूर्वी तेथील पोलीस आयुक्तांनी त्यांना अटीशर्थी घातल्या होत्या. ते त्यांनी एकदा तपासून घ्यावं. पोलिसांनी त्यांचं काम करावं. त्यांच्या कामात कुणीच राजकीय हस्तक्षेप करणार नाही. त्यांनी जर अटी किंवा नियमांचं तंतोतंत पालन केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही, असं पवार म्हणाले.


हेही वाचा : केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बारा वर्ष लागणार- नाना पटोले


 

First Published on: May 2, 2022 2:27 PM
Exit mobile version