अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्वच कळतं असं नाही; अजित पवारांचा फडणवीसांना टोला

अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्वच कळतं असं नाही; अजित पवारांचा फडणवीसांना टोला

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त झालं आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठवाड्यात अजून गेले नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार पलटवार केला. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्वच कळतं असं नाही, असा टोला अजित पवार यांनी फडणवीसांना लगावला.

अजित पवार सोमवारी साताऱ्यात होते. यावेळी त्यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याचा आढावा बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. मराठवाडा भागात अद्याप मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाहणी करायला गेले नाहीत असं विरोधक म्हणत आहेत. पण पाहणी केली म्हणजे सर्व कळतंच असं नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी गेले आहेत. आजही ते गेले आहेत. मंत्रालयात बसून व्हीसी घेऊन सर्वांशी संपर्क साधला जात आहे. शेतकऱ्यांना काय मदत पाहिजेत याचा आढावा घेतला जात आहे, असं अजित पवार म्हणाले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड हे सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. आम्ही गेल्यावर प्रोटोकॉल प्रमाणे सर्व शासकिय यंत्रणा आमच्या मागे येते. त्यांचं संपूर्ण दिवसाचं काम बुडतं. त्यामुळे गैरसमज पसरवू नका, जेथे पाहणी केली पाहिजे तिथे केली पाहणी जात आहे, असं पवार म्हणाले.

गुजरातप्रमाणे तीन टप्यात एफआरपी दिल्यास…

राज्यातील साखरकरखाने शेतकऱ्याला एफआरपी देण्यात उशीर करत आहेत. तर सर्वच कारखान्यांची एफआरपी एकसारखी नाही त्यामुळे गुजरात राज्या प्रमाणे तीन टप्यात एफआरपी दिल्यास शेतकऱ्याच्या ऊसाला सर्वाधिक दर देता येण शक्य आहे. असे सांगत यंदा एफआरपी देताना ऊसाची आवक किती आहे हे पाहून शेतकऱ्याला एफआरपी द्या. कारखान्यांनी शेतकऱ्यावर अन्याय करू नये असं आवाहन अजित पवार यांनी कारखान्यांना केलं आहे

 

First Published on: October 4, 2021 2:20 PM
Exit mobile version