कोकणातील ‘या’ तीन पर्यटनस्थळांना ब वर्गाचा दर्जा

कोकणातील ‘या’ तीन पर्यटनस्थळांना ब वर्गाचा दर्जा

कोकणात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. त्यातच रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा आणि अलिबाग, श्रीवर्धन या पर्यटनस्थळांना ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळांचा दर्जा प्राप्त झाला आहे. अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. या पर्यटनस्थळांना ब वर्गाचा दर्जा प्राप्त केल्याने या पर्यटनस्थळांना शासकीय सुविधांचा लाभ घेता येईल. जेणेकरून त्या भागाचा विकास होईल. मिळालेल्या दर्जामुळे शासनामार्फत विविध पर्यटन सुविधांचा विकास होईल.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकारामुळे या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. कोकणातील इतर जिल्ह्यांतील समुद्रकिनाऱ्यांचाही या धोरणांतर्गत विकास करण्यात येणार आहे. बीच शॅक धोरणालाही शासानातर्फे मंजुरी मिळाली आहे. चिपी विमानतळही लवकरच सुरु होणार आहे. रायगड जिल्ह्यातील या पर्यटनस्थळांना ब वर्गाच्या दर्जाप्रमाणे सोयीसुविधा आणि निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही आदित्य ठाकरे यांना सांगितले आहे.

काय आहे ‘बीच शॅक’ धोरण?

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी ‘बीच शॅक्स’ म्हणजेच चौपाटी कुटी उभारण्यासंदर्भातील धोरणास मंजुरी दिली आहे. या धोरणांतर्गत रायगड जिल्ह्यातील वरसोली आणि श्रीवर्धन येथील हरिहरेश्र्वर समुद्रकिनाऱ्यांचा विकास करण्यात येणार आहे.

चिपी विमानतळही लवकरच सुरु!

कोकणाला हवाईमार्गे जोडण्यासाठी ‘उडान’ अंतर्गत विमानसेवांचा विकास होत आहे. त्यातच सिंधुदुर्गमध्ये हॉटेल ताज ग्रुप गुंतवणूक करत असून, चिपी विमानतळही लवकरच सुरु होणार आहे. राज्य सरकारच्या वतीने कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यात येत आहे.

निसर्गरम्य कोकण आणि विलोभनीय समुद्रकिनारा

कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा आणि अलिबाग, श्रीवर्धन या पर्यटनस्थळांना ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळांचा दर्जा प्राप्त झाला आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्राच्या किनारचपट्टीवरील लाभलेला विस्तृत समुद्रकिनारा आणि मुरुड-जंजिरा येथील आकर्षित करणारी भौगोलिक परिस्थिती होय. अलिबागमधील कुलाबा किल्ला, 150 वर्षे जुनी ब्रिटिशकालीन वेधशाळा, मंदिरे आणि अनेक ऐतिहासिक पर्यटनस्थळे आहेत. मुरुड-जंजिरा शहरात प्रवेश करताच नवाबी नजाकतीचा राजवाडा, पुरातन देवस्थाने याशिवाय, पेशवाई आणि त्या अगोदरच्या काळातील वास्तू आहेत. तसेच श्रीवर्धन येथे सुमारे 4 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.


हेही वाचा – लाल किल्ल्यावरील धुडगुसात भाजप कार्यकर्ते – शरद पवार


 

First Published on: February 14, 2021 3:21 PM
Exit mobile version