नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शनिवारपासून बंद!

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शनिवारपासून बंद!

apmc market

मुंबई शहर आणि उपनगरांना भाजीपाला आणि अन्नधान्याचा पुरवठा करणारे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शनिवारपासून बंद ठेवण्यात येणार आहे. मसाला मार्केटमधील एका व्यापार्‍याला करोनाची लागण झाल्याचे बुधवारी उघड झाले. त्यानंतर कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळ मार्केटमधील व्यापार्‍यांनी गुरुवारी एका बैठकीत तीनही बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र धान्य मार्केट तुर्तास सुरूच ठेवण्यात येणार आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत सुरुवातीला एपीएमसीच्या परिसरात ग्राहकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे पोलिसांनी या भागात आता कडक बंदोबस्त ठेवल्याने गर्दीवर नियंत्रण आले आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी भाजीपाला मार्केटमध्ये दररोज फक्त २०० गाड्यांना परवानगी दिल्यामुळे मार्केटचा व्यवहार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सुरू आहे.

मात्र बुधवारी मसाला मार्केटमधील एका व्यापार्‍याला करोना विषाणूची बाधा झाली. करोना संसर्ग झालेला हा व्यापारी हा मुंबईचा रहिवासी आहे. मुंबईतून त्यांचे ये-जा करणे होते. या विषयावर गुरुवारी भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापार्‍यांच्या बैठका झाल्या. त्यामध्ये कांदा-बटाटा मार्केट, भाजीपाला आणि फळ मार्केट शनिवारपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे आणि संजय पानसरे यांनी सांगितले.

धान्य मार्केटमध्ये वर्दळ कमी!
कांदा-बटाटा आणि भाजीपाला मार्केटच्या तुलनेमध्ये धान्य मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ फार कमी असते. त्यामुळे आम्ही तुर्तास तरी धान्य मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आमचे मार्केट नियमित सुरू राहणार आहे. ग्राहकांनी मार्केटमध्ये न येता फक्त फोनवरच ऑर्डर द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली असून तिला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे धान्य मार्केटचे संचालक निलेश विरा यांनी सांगितले.

First Published on: April 10, 2020 7:17 AM
Exit mobile version