आदित्य ठाकरे मोदी लाटेतून जिंकले, त्यांचं अभ्यास करण्याचं वय; आशिष शेलारांचा पलटवार

आदित्य ठाकरे मोदी लाटेतून जिंकले, त्यांचं अभ्यास करण्याचं वय; आशिष शेलारांचा पलटवार

मुंबई – आदित्य ठाकरे हे मोदी लाटेतून जिंकून आलेले आहेत. ते युतीतून जिंकून आले. त्यामुळे वरळी त्यांचा गड आहे असं आम्ही मानत नाहीत, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी लगावला. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. (Ashish Shelar on Aditya Thackeray over dahihandi in worli)

वरळी सगळ्यांना आवडायला लागली आहे. वरळी ए प्लस होत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. प्रत्येकाने तिथे येऊन दहीहंडी साजरी करावी. आम्ही कुठेही चॅलेंज करणार नाही. हा सण आहे. दोन वर्षांपासून कोरोनाचा काळ होता, स्वाईन फ्लूपण वाढत होता. हे सगळ झाल्यानंतर आपल्याला सण-वार कुठेतरी साजरे करायला मिळत आहे. यात उगीच कार्यकर्त्यांची लढाई लावणे, मारामारी करणे, पोलीस केस घेणे किंवा लोकांमध्ये ताण तणाव निर्माण करणे पोलिसांवरील ताण वाढवणे यात कुठेही आम्ही जाणार नाही, असं आदित्य ठाकरें म्हणाले होते. त्यावर आशिष शेलारांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा शिंदे -फडणवीसांना जनतेचा आवाज ऐकू जात नाही, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

आशिष शेलार म्हणाले की, ‘गड कोणाचा कोणी ठरवला, गडावर ठरणं आणि ठरवणं हे शेलारमामांशिवाय कोण ठरवणार? त्यांना आम्ही गड वगैरे मानत नाहीत. युतीतून ते जिंकून आलेत. मुंबईभर ३२७ दहीहंडीचे कार्यक्रम करते. २१७ वर मंडळांना पक्षाच्यावतीने विमा कवच दिला आहे.’

आदित्य ठाकरे यांनी जी भाषा वापरली ती अशोभनीय आहे. बेईमान, लाचार, गद्दार हे शब्द अशोभनीय आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मदत घ्यायची आणि चांगल्या खात्यांसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसायचं ही गद्दारी नाही का? असाही सवाल शेलारांनी उपस्थित केला. आदित्यजी जरा अभ्यास करा. अभ्यास करण्याचं वय आहे, मगच भाष्य करा, असं शेलार म्हणाले.

हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या ‘मतदारांची हंडी’ फोडण्यासाठी आशिष शेलारांचे वरळीत थर

महापालिकेच्या कामाला तर आधीच लागलो, टप्पया टप्प्याने पुढे चाललो आहोत. पुढे अजून बरेच टप्पे यायचे आहेत. जांभोरी खाली झांकी है अभी और बहोत कुछ बाकी है, असा नाराही शेलारांनी यावेळी केला.

First Published on: August 17, 2022 12:30 PM
Exit mobile version