औरंगाबादमध्ये बहिण – भावाची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एमआयटीसमोरील एका बंगल्यात या दोघांची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. किरण खंदाडे (१८) आणि सौरभ खंदाडे अशी मृत बहिण भावाची नावे आहेत.
नेमके काय घडले?
औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एमआयटीसमोरील एका बंगल्यात लालचंद खंदाडे हे कुटुंब भाड्याने राहत होते. मात्र, शेतीच्या कामासाठी लालचंद आपल्या पत्नीला आणि एका मुलीला घेऊन जालना येथे गेले होते. त्यामुळे घरात त्यांची मोठी मुलगी किरण आणि तिचा भाऊ सौरभ हे दोघेच होते. रात्री ८ च्या सुमारास लालचंद राजपूत घरी परतले. मात्र, वाहनाचा हार्न वाजवूनही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी वाहन उभे करून घरात पाहिले तर बाथरूममध्ये बहीण-भावाचे मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटना उघडकीस आली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपायुक्त डॉ. राहुल खाडे, मिना मकवाना, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दोघांच्या हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी सांगितले, की या हत्या दुपारच्या सुमारास झाली असून घटना रात्री उघडकीस आली आहे. हत्येप्रकरणी लालचंद खंदाडे यांनी सातारा पोलिसात फिर्याद दिली आहे. दीड किलो सोने, साडेसहा हजार रोख आणि मुलीचा मोबाईल, अंगठी असे सर्व सामान चोरीला गेल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
हल्लेखोर ओळखीचे असल्याचा अंदाज
पोलिसांच्या माहितीनुसार; घटनास्थळी चार चहाचे कप आढळून आले आहेत. त्यामुळे हे हल्लेखोर ओळखीचे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, किरण आणि सौरभ या दोघांचे गळे चिरलेले आढळून आले. त्यामुळे मोठा रक्तस्राव झाल्याने दोघांचाही मृत्यू झालेला होता. किरणचा गळा चिरण्यापूर्वी तिच्या डोक्यात काही तरी जड वस्तूने जोरदार प्रहार केलेला असल्याचेही आढळून आले आहे. चोरट्यांकडून पाळत ठेवून हा गुन्हा करण्यात आला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.
या मुलांचे आई-वडील गावाला गेले आहेत. त्यामुळे मुले घरी एकटीच आहेत, याची चोरट्यांनी आधी पाहणी केली असावी. त्यानंतर संधी साधून चोरटे घरात घुसले असावेत. चोरट्यांना पाहून या भावाबहिणीने प्रतिकाराचा प्रयत्न केला असावा, तेव्हा चोरट्यांनी दोघांचे गळे चिरून हत्या केली आणि मग घरातील सोने, रोख रक्कम आणि मोबाईल चोरून पळ काढला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोर आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा – ड्रायव्हिंग लायसन्स, पीयुसी, परमिट, नोंदणी, विमा कागदपत्रांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ