श्रेयवाद : काँग्रेसच्या प्रयत्नांमुळेच चित्ते भारतात.., बाळासाहेब थोरातांनी ट्वीट करत सांगितला घटनाक्रम

श्रेयवाद : काँग्रेसच्या प्रयत्नांमुळेच चित्ते भारतात.., बाळासाहेब थोरातांनी ट्वीट करत सांगितला घटनाक्रम

तब्बल ७० वर्षांनंतर नामिबियन चित्ते आज पुन्हा भारतात येत आहेत. प्रोजेक्ट चीता अंतर्गत हे आठ चित्ते आणले जात आहेत. यात पाच मादी आणि तीन नर चित्ते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हे चित्ते खास बांधण्यात आलेल्या उद्यानात सोडले जाणार आहेत. हे चित्ते काँग्रेसच्या प्रयत्नांमुळंच भारतात येत असल्याचं सांगत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत संपूर्ण घटनाक्रमच सांगितला आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने आफ्रिकेतून चित्ते आणण्यासाठी प्रोजेक्ट चीताची सुरुवात केली. तत्कालीन वने आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आता चित्ते भारतात येत आहेत ही आनंदाची बाब आहे, असं ट्वीट बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

प्रोजेक्ट चीताचा प्रस्ताव २००८-०९ मध्ये तयार झाला. मनमोहन सिंह सरकारने त्याला मान्यता दिली. एप्रिल २०१० मध्ये तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश आफ्रिकेतील चीता आउटरीच सेंटरमध्ये गेले. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं प्रकल्पाला स्थगिती दिली. २०२० मध्ये कोर्टाने स्थगिती उठवली. आता चित्ते आणले जात आहेत, असं थोरात म्हणाले.

दरम्यान, थोरातांनी जयराम रमेश यांचा त्या वेळचा चित्त्यांसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. हे चित्ते भारतात येत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. परंतु काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजपाने टीका केली आहे. मोदी सरकारला श्रेय मिळू नये यासाठी काँग्रेस नेते धडपड करत आहेत, अशी टीका भाजपनं केली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यात आता श्रेयवादाच्या लढाईला सुरूवात झाली आहे.


हेही वाचा : कित्येक दिवस मंत्रिमंडळात असताना ‘त्या’ दोघांनी प्रकल्पाबाबत प्रयत्न करायला हवे होते, अजित पवारांचा टोला


 

First Published on: September 17, 2022 1:18 PM
Exit mobile version