बंजारा बोलीभाषेचे संवर्धन करणार; फडणवीसांकडून अकादमीची घोषणा

बंजारा बोलीभाषेचे संवर्धन करणार; फडणवीसांकडून अकादमीची घोषणा

संग्रहित छायाचित्र

 

वाशिमः बंजारा समाजाची बोलीभाषा गोड आहे. या गोड बोलीचे संवर्धन झाले पाहिजे. आमचे सरकार असताना त्याची घोषणा झाली. पण पुढे काही झाले नाही. आता या गोड बोलीचे संवर्धन करण्यासाठी अकादमी सुरु केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जाहिर केले. आपल्या भाषणाची सुरुवात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खास बंजारा बोली भाषेतच केली.

पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण रविवारी झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बंजारा बोलीभाषेचे संवर्धन करण्यासाठी अकादमी सुरु करणार असल्याची घोषणा केली.  पुढे ते म्हणाले, आमचे सरकार असाताना बंजारा समाजासाठी भरघोस निधी जाहिर केला होता. अडीच वर्षांच्या काल खंडातील सरकारने त्याचे पुढे काहीच केले नाही. काम न करणाऱ्यांना सेवालाल महाराजांनी घरी बसवले व काम करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आमचे सरकार पुन्हा आले. त्यामुळे बंजारा समाजाच्या विकासासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न केले जातील.

पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी आहे. मुळ काशीचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. त्याचप्रमाणे बंजारा समाजाच्या या काशीचा कायपालट आमचे सरकार करणार आहे. बंजारा समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी. शिक्षणासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

पुढे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बंजारा समाज हा लढवय्या आहे. मात्र सेवालाल महाराजांनी जी २२ तत्त्वे सांगितली. त्यामध्ये शांतीचा संदेशही देण्यात आला आहे. त्यांचे तत्त्व जगाने स्विकारले आहे. बंजारा समाजाची सभ्यता व संस्कृती प्राचिन आहे. मोहोंदो जोडोच्या अवशेषात बंजारा संस्कृती आढळली आहे.

बंजारा समाजासाठी नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करावी, अशी मागणी तुम्ही केलेली आहे. ही मागणी कायद्याच्या चौकटीत बसणारी असेल तर नक्कीच त्याचा विचार केला जाईल. महाधिवक्ता यांचे मत या मागणीवर मागविले जाईल. त्यानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

बंजारा समाजाच्या विकासासाठी ५३७ कोटी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे दिल्या आहेत. बंजारा समाजासाठी भरघोस निधी द्या, असे मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले आहे. त्यामुळे तुमच्या महामंडळासाठीही निधी दिला जाईल. मंदिर असो की समाधी सर्वांचाच उद्धार केला जाईल. एकूणच बंजारा समाजाच्या उत्कर्षासाठी ५३७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

 

First Published on: February 12, 2023 3:56 PM
Exit mobile version