पाणीपट्टी थकवली, मुख्यमंत्र्यांचा बंगला महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित

पाणीपट्टी थकवली, मुख्यमंत्र्यांचा बंगला महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह अनेक मंत्र्यांची शासकीय निवास्थानाची पाणीपट्टी थकली असल्याचे समोर आले आहे. तब्बल २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. त्यामुळे पालिकेने कारवाई करत मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांचे बंगले डिफॉल्टर म्हणून घोषित केले. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी काढलेल्या माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल तर सर्वसामान्य जनतेनं का भरावी? महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल मंत्र्यांच्या निवासस्थानांचे पाणी रोखण्याची हिंमत करणार का?,’ असा प्रश्न शकील अहमद शेख यांनी केला आहे.

माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावरून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती संकलित केली आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ थकबाकी असल्याचे समोर आले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासोबतच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा (तोरणा), उपमुख्यमंत्री अजित पवार (देवगिरी), जलसंपदामंत्री जयंत पाटील (सेवासदन), ऊर्जामंत्री नितीन राऊत (पर्णकुटी), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (रॉयलस्टोन), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (सागर), अशोक चव्हाण (मेघदूत) सुभाष देसाई, उद्योगमंत्री (पुरातन), दिलीप वळसे-पाटील (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), राजेश टोपे (जेतवन), विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (चित्रकूट), राजेंद्र शिंगणे (सातपुडा), नवाब मलिक (मुक्तागिरी), छगन भुजबळ (रामटेक), विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (अजिंठा) आणि सह्याद्री अतिथीगृहाचा समावेश आहे.

 

First Published on: December 14, 2020 1:45 PM
Exit mobile version