संजय राऊत हक्कभंगप्रकरणी सभागृहात राडा, विधिमंडळाचे दोन्ही सभागृह स्थगित

संजय राऊत हक्कभंगप्रकरणी सभागृहात राडा, विधिमंडळाचे दोन्ही सभागृह स्थगित

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – संजय राऊतांनी विधिमंडळ सदस्यांना चोरमंडळ संबोधल्याने विधान सभा आणि विधान परिषदेत आज तुफान गोंधळ झाला. कामकाज सुरू होताच विधान सभेत आशिष शेलार आणि अतुळ भातखळकर यांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली. विधान परिषदेतही यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. संजय राऊतांच्या वक्तव्याची पडताळणी हक्कभंग समितीकडून केली जाईल. त्यानंतर, ८ मार्चला याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं.

आज सकाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहाला उज्जवल परंपरा आहे असं सांगत संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधात त्यांच्यावर हक्कभंग आणावा असा प्रस्ताव आणण्यात आला. याला महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही मुकसंमती होती. सभागृहाचा आणि विधिमंडळ सदस्यांचा अपमान झाला असेल तर परंपरेनुसार संबंधितांवर कारवाई व्हावी अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रत्येकाची मते ऐकून घेत असताना सभागृहात तुफान गोंधळ झाला. त्यामुळे अधिवेशन सुरू झाल्यानंतर दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतर सभागृहात संजय राऊतांविरोधात घोषणाबाजी सुरू झाल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृह स्थगित करत असल्याची घोषणा केली. त्याआधी त्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधात हक्कभंग समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार, संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याची पुढील दोन दिवसांत हक्कभंग समितीकडून चौकशी केली जाईल. या चौकशीतून समोर आलेल्या अहवालानुसार ८ मार्च रोजी निर्णय सुनावला जाईल, असं राहुल नार्वेकर यांनी सभागृहात स्पष्ट केले.

संजय राऊतांविरोधात आक्रमक भूमिका घेताना सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्याविरोधात सभागृहात घोषणाबाजी झाली. संजय राऊत हाय हाय करत सत्ताधाऱ्यांनी सभागृग दणाणून सोडला.

हक्कभंग प्रस्ताव मांडताना कोण काय म्हणाले?

गुलाबराव पाटील – विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणारा ही कोणती औलाद आहे? सभागृहाची गनिमा आहे. लोकांच्या मतावर येथे आलो आहे. यांच्यासारखे मागच्या दरवाजाने आलो नाही. यांनी शिवेसनेची वाट लावली. उरलेल्या १६ चीही वाट लावतील. उद्धव ठाकरेंनाही उल्लू बनवलं. ३५- वर्षे काम करणाऱ्यांची वाट लावली. शिवेसनेची वाट लावण्याऱ्याने
या सभागृहाचा अपमान केला आहे. चार लाख लोकांतून निवडून येतो, त्यामुळे आम्ही चोर नाही. या चोराने आमची मते घेतली आहे. गनिमा राखायची असेल तर आज त्यांनी खासदारपदाचा राजीनामा द्यावा.

भास्कर जाधव – या सभागृहाच्या प्रतिष्ठेबद्दल, सन्मानाबद्दल अपमान होत असेल तर परंपरेनुसार काही निर्णय झाले तर मान्य केले पाहिजेत. सभागृहात हा विषय आला तेव्हा मी येथे नव्हतो. सभागृहात काय विषय चाललाय याची माहिती घेतली. पण तो कोणत्या टिपेला गेला हे मला माहित नव्हतं. पण अध्यक्षांमार्फत मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की परंपरेनुसार, चहापानाला बोलावलं जातं. आम्ही चहापानाला गेलो नाही म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला देशद्रोही म्हणाले. हेच मुख्यमंत्री अडीच वर्षे मांडीला मांडी लावून बसले होते.

शंभूराज देसाई – अधिवेशन संपण्याआधी हक्कभंग समितीचा निर्णय जाहीर करावा.

नाना पटोले – हक्कभंगाचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही याबाबत निर्णय घ्यावा. राज्याच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत, त्यावर बोलायचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

नितेश राणे- रोज सकाळी बसून संजय राऊतांना ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण काय खाललं आहे यांचं. त्यांचा आणि शिवसेनेचा संबंध काय आहे? सामनाच्या आधी ते लोकप्रभामध्ये होते. तेव्हा शिवसेनेविरोधात त्यांचे लेख असायचे. बाळासाहेब ठाकरेंविरोधातही त्यांनी लिहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचं पटत नाही असंही त्यांनी लिहिलं होतं. त्यामुळे त्यांचं संरक्षण काढा. पोलिसांचं संरक्षण काढा. दहा मिनिटे संरक्षण काढा, परत उद्या सकाळी ते दिसणार नाहीत.

First Published on: March 1, 2023 1:01 PM
Exit mobile version