भाजपची ऑफर न स्वीकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत – चंद्रकांत पाटील

भाजपची ऑफर न स्वीकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत – चंद्रकांत पाटील

शरद पवारांचा एकेरी उल्लेख अनावधानाने, चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युतीसाठी ऑफर दिली होती, असं म्हटलं होतं. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजपची ऑफर न स्वीकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. काही झालं तरी केंद्राला दोष द्यायचा, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

“शरद पवार यांना जर केंद्राने तुम्ही आमच्या बरोबर सरकार बनवा अशी ऑफर दिली होती. मग ती ऑफर न स्वीकारण्याइतके पवार साहेब कच्च्या गुरुचे चेले नाहीत. केंद्रामध्ये सरकार असणाऱ्या पक्षासोबत महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्याला प्राधान्य दिलं असतं. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला हे काय बोलतात, याचे काय अर्थ होतात हे नीट कळतं. महाविकास आघाडीतील नाराजी ही काहीतरी ताटात आणखी पाडून घेण्यासाठी असते. त्यावरुन काही निष्कर्ष काढण्याची आवश्यकता नाही,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीची स्थिती नाचता येईन अंगण वाकडे

“काही झालं की त्याचा दोष केंद्राला द्यायचा. कोळसा कमी आहे त्यामुळे वीज निर्मिती कमी होणार आहे. कारण केंद्राने कोळसा दिला नाही. पण हे सांगणार नाही केंद्राने हा आग्रह धरला होता की कोळसा पावसामुळे कमी मिळेल, वेळेत साठवणूक करा. तो आम्ही केला नाही हे ते सांगणार नाही,” असं म्हणत महाविकास आघाडीची स्थिती ही नाचता येईन अंगण वाकडे अशी आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

सुप्रिया सुळे, नीलमताई गोऱ्हे कुठे आहेत?

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील घटनेवरुन खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्यावर टीका केली. राज्यात घडणाऱ्या महिला अत्याचारांवर गप्प का? माझ्या काळाता रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो काढणाऱ्या सुप्रिया सुळे कुठे आहेत? महिलांवर अत्याचार झाल्यावर आवाज उठवणाऱ्या नीलम गोऱ्हे आता कुठे आहेत? सत्तेसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी जुळवून घ्यायचं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा नागपूरमध्ये काही जरी झालं तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये, गल्लीमध्ये पाकीटमारी असं चालायचं. मग आता नितीन राऊत आता झोपा काढत आहेत का? गुन्हेगारी कळत नाही काय? महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत. याआधी असं कधी घडलं नव्हतं.

 

First Published on: October 13, 2021 11:54 AM
Exit mobile version