केंद्र सरकारच्या मेंदूचा केमिकल लोचा, ‘सामना’तून जोरदार टीका

केंद्र सरकारच्या मेंदूचा केमिकल लोचा, ‘सामना’तून जोरदार टीका

मुंबई : वादग्रस्त उद्योगपती गौतम अदानी यांच्यासंदर्भात कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात जावे, असा मोलाचा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. उगाच विनाकारण आरोप करून काय उपयोग? असे सांगत केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातल्या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारास एक प्रकारे कवचकुंडलेच प्रदान केली. शाह यांनी आणखी एक मजेशीर विधान केले. त्यांनी असा विनोद केला की, सर्व कॉमेडी शो त्यापुढे फिके पडावेत. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे काम अत्यंत निष्पक्ष पद्धतीने सुरू आहे, असे ते म्हणाले. शाह यांची ही विधाने म्हणजे केंद्र सरकारच्या मेंदूचा एक प्रकारे जो केमिकल लोचा झाला आहे, त्याचा पुरावा आहे, अशी जोरदार टीका ठाकरे गटाने केली आहे.

गौतम अदानींचे सध्याचे प्रकरण विचार करायला लावणारे आहे. गृहमंत्री म्हणतात, पुरावे असतील तर कोर्टात जा. मग राजकीय विरोधकांच्या बाबतीत ‘ईडी’, ‘सीबीआय’ने आधी अटका केल्या व मग कोर्टबाजी केली. अटक करण्यासाठी खोटे पुरावे उभे केले. पाच-पन्नास लाखांच्या व्यवहारासाठी विरोधकांना अटक केली, तेव्हा अमित शाह यांनी ”आधी कोर्टात जा” हा सल्ला दिला नाही, पण गौतम अदानी यांच्या बाबतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विरोधकांकडे पुरावे मागत आहेत, असे ‘सामना’तील अग्रलेखात ठाकरे गटाने म्हटले आहे.

रिजिजू यांची न्यायव्यवस्थेविरुद्ध वक्तव्ये
अदानी यांच्या विरोधात कोर्टात जा, असे गृहमंत्री अमित शाह सांगतात; मग यावेळी ईडी वगैरे निष्पक्ष संस्था काय करत आहेत? हाच प्रश्न आहे. अदानींच्या विरोधात लोकांनी न्यायालयात जायचे, पण त्याच वेळी कायदामंत्र्यांनी किरेण रिजिजू यांनी न्यायालयांना जाहीरपणे धमक्या द्यायच्या. रिजिजू हे न्यायव्यवस्थेविरुद्ध बेबंदपणे बोलत आहेत. ‘काही निवृत्त न्यायाधीश भारतविरोधी टोळीत आहेत व त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. हे निवृत्त न्यायमूर्ती न्यायपालिकेला सरकारविरुद्ध उभे करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल,’ अशी धमकीची भाषा न्यायमूर्तींच्या बाबतीत देशाच्या कायदामंत्र्यांनी करावी हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव म्हणायला हवे, असे या अग्रलेखात नमूद केले आहे.

देशाच्या लोकशाहीची ही अवस्था…
अदानी यांच्या विरोधात पुरावे असतील तर विरोधकांनी न्यायालयात जावे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगायचे व त्याआधी कायदामंत्र्यांनी न्यायालयांना धमकी देऊन मोकळे व्हायचे. म्हणजे उद्या कोणी उद्योगपती अदानी यांच्या विरोधात कोर्टात गेले, त्या प्रकरणात न्यायाधीशांनी काही भूमिका घेतली आणि ती सत्ताधाऱ्यांना पटणारी नसेल तर कायदामंत्री रिजिजू सांगतात त्याप्रमाणे त्या न्यायाधीशांना देशविरोधी टोळीतील सदस्य ठरवून बदनाम केले जाईल. देशाच्या लोकशाहीची ही सध्याची अवस्था आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

गृहमंत्री, कायदामंत्र्यांचा शाब्दीक गोंधळ न पटणारा
मुळात देशविरोधी टोळी म्हणजे काय व त्यात कोण सामील झाले? सरकारी निर्णयाविरुद्ध मत व्यक्त करणे हे ज्यांना देशद्रोही कृत्य वाटू लागते ते सगळेच लोकशाही व स्वातंत्र्याचे विरोधक आहेत. त्यामुळे देशाचे गृहमंत्री व कायदामंत्री ‘लोकशाही’, ‘स्वातंत्र्य’, ‘तटस्थता’ वगैरे शब्दांचा वापर करून जो गोंधळ घालीत आहेत तो पटणारा नाही, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

निवडणूक आयोग भाजपचा मांडलिक
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी समिती स्थापन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनाही कायदामंत्री रिजिजू यांनी विरोध दर्शविला. त्यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. निवडणूक आयोग हा भाजपाचा घरगडी असल्याप्रमाणेच वागत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयात निवडणूक आयोगाचे मोठेच योगदान आहे, हे आता उघड झाले आहे. जगातील सर्व देशांनी ‘ईव्हीएम’द्वारे मतदान बंद केले. कारण त्यात घोटाळे होत आहेत, पण फक्त हिंदुस्थानात ‘ईव्हीएम’ सुरू आहे. कारण भाजपास घोटाळा केल्याशिवाय जिंकता येत नाही. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पक्ष फोडले गेले. सरकारे पाडून त्यांना हवी तशी सरकारे बनवून देणारा कंत्राटदार म्हणून निवडणूक आयोग सध्या भाजपाच्या मांडलिकाची भूमिका बजावत आहे. त्यावरच सर्वोच्च न्यायालयाने हातोडा मारल्याने कायदामंत्र्यांनी निषेध व्यक्त केला. निवडणूक आयोग स्वतंत्र व निष्पक्ष नसेल तर देशातील निवडणूक व त्यातून निर्माण होणारी सरकारेसुद्धा निष्पक्ष राहू शकत नाहीत व गेल्या सात वर्षांत देशातील सर्व यंत्रणा, संस्था एकतर भ्रष्ट केल्या गेल्या किंवा आपल्या खिशात ठेवण्याचे काम झाले, अशी खरमरीत टीका ठाकरे गटाने केली आहे.

देशात ‘धमकी राज’ला सुरुवात
हिंदुस्थानात लोकशाही मारली जात आहे असे राहुल गांधी परदेशात बोलून गेले. आता त्यांनाही देशविरोधी ठरवून किंमत मोजावी लागेल. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली आता सुरू आहेत. हे कसले लक्षण मानायचे? देशात लोकशाहीच्या नावाने ‘धमकी राज’ सुरू झाले आहे. वैफल्यावस्थेचे हे शेवटचे लक्षण असावे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

First Published on: March 20, 2023 9:24 AM
Exit mobile version