विजयाच्या जवळ, पण जल्लोष नको; जीवलगाच्या निधनामुळे सत्यजीत तांबे भावूक

विजयाच्या जवळ, पण जल्लोष नको; जीवलगाच्या निधनामुळे सत्यजीत तांबे भावूक

Manas Pagar Death |  नाशिक – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे कल आज समोर येत आहेत. त्यापैकी कोकण, अमरावती, औरंगाबाद, नागपूरचा निकाल स्पष्ट झाला आहे. तर, नाशिकमध्ये अद्यापही मतमोजणी सुरू आहे. मात्र, सत्यजीत तांबे हे सध्या आघाडीवर असून तेच विजयी होतील असं म्हटलं जात आहे. परंतु, विजयी झाल्यानंतरही कोणी आनंदोत्सव साजरं करणार नाही, असं आवाहन सत्यजित तांबे यांनी ट्वीटद्वारे केले आहे. कारण, आज त्यांच्या एका सहकार्याचं निधन झालं आहे.

हेही वाचा – सत्यजित तांबेंना बाळासाहेब थोरातांचा अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा, पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तीय आणि नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार यांचे आज अपघाती निधन झाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागण्याच्या दिवशीच त्यांचं निधन झाल्याने सत्यजीत तांबे यांना अधिक धक्का बसला आहे. नाशिकमधील युवा नेता म्हणून मानस पगार यांची ओळख होती. त्यामुळे आजचा निकाल लागल्यानंतर कोणीही जल्लोष करू नये असं आवाहन सत्यजीत तांबे यांनी केलं आहे.

सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत,पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती.


मानस पगार यांचा बुधवारी रात्री नाशिक मुंबई महामार्गावरील कन्नमवार पुलाजवळ अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकने मानस पगार यांच्या कारला धडक दिल्याने हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की त्यांच्या कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मानस पगार यांचे सहकारीही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

मानस पगार हे नाशिक जिल्ह्यातील तरुण नेते होते. सत्यजीत तांबे यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. नाशिकमध्ये त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत, त्यामुळे त्यांची सर्वत्र ओळख होती. त्यामुळे त्यांच्या अकाली निधनाने राजकीय वर्तुळ शोकाकूल झाले आहे. अशा वातावरणात डॉ.सुधीर तांबेही मतमोजणी केंद्रावर न जाता मानस पगार यांच्या अंत्यविधीला गेले होते. त्यामुळे आपला विजय निश्चित असला तरीही कोणीही जल्लोष करू नये, कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा असं आवाहन सत्यजीत तांबेंनी केलं आहे.

First Published on: February 2, 2023 9:09 PM
Exit mobile version