…तर शहीद झालो असतो, एकनाथ शिंदेंची धक्कादायक माहिती

…तर शहीद झालो असतो, एकनाथ शिंदेंची धक्कादायक माहिती

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळीनंतर मोठं विधान केलं आहे. आम्ही बंड केल्यानंतर ती लढाई काही खोटी नव्हती. लढाई खूप मोठी होती. एकीकडे सरकार, सत्ता आणि यंत्रणा होती. कोण कुठे जातोय यावर देखील वॉच ठेवला जात होता. तर दुसरीकडे सामान्य कार्यकर्ते होते. आम्हाला दगाफटका होईल असं वाटत होतं. थोडं जरी इकडं तिकडं झालं असतं आणि दगाफटका झाला असता तर शहीदच झालो असतो, अशी धक्कादायक माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी गेले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच त्यांच्या मूळ गावी दरे येथे आले आहेत. यावेळी त्यांनी गावातील पद्मावती देवीचं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर ते तापोळा येथे आले होते. यावेळी पद्मावती मंदिरात शिंदेंच्या स्वागतासाठी एक छोटेखानी सभा आयोजित करण्यात आली होती. बंड करताना थोडाजरी दगा फटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता. लोकांच्या आणि देवीच्या आशीर्वादाने सगळं काही सुरळीत झालं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मंत्र्यांची खाती वाटप कधी होणार?

मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल विचारलं जात होतं, तो झाला आहे. आता लवकरच खातेवाटपही होईल. लवकरच सगळ्या गोष्टी वेळेवरच होतील. आम्ही विकासकामे थांबू दिली नाहीयेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत दिलीये. एनडीआरएफच्या नियमाच्या दुप्पट नुकसनाभरपाई द्यायचा निर्णय घेतला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

साताऱ्याचा विकास व्हावा, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हे टुरिस्ट स्पॉट व्हावा, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शिवसेना आणि भाजपची राज्यात सत्ता आहे. त्यामुळे या सरकारबद्दल कुणीही काळजी-चिंता करण्याचं कारण नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय. राज्यात सुगीचे दिवस येतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा : आरे कारशेड हा तर देवेंद्र फडणवीसांचा इगो, सुनील राऊतांचा हल्लाबोल


 

First Published on: August 12, 2022 2:25 PM
Exit mobile version