मुख्यमंत्र्यांविरोधात मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार, कोरोना नियमांचा भंग केल्याचा आरोप

मुख्यमंत्र्यांविरोधात मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार, कोरोना नियमांचा भंग केल्याचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री वर्षा बंगला सोडून मातोश्री गाठले. यावेळी हजारो शिवसैनिक उपस्थित होते. शिवसैनिकांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देऊन परिसर दणादूण सोडला. शिवसैनिकांचं अभिवादन स्वीकारत गर्दीतून वाट काढत उद्धव ठाकरे गाडीत बसून मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले. मात्र, कोरोना झाला असतानाही उद्धव ठाकरे लोकांमध्ये मिसळल्याने त्यांच्याविरोधात मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

उद्धव ठाकरे यांना कोरोना झाल्याचे वृत्त बुधवारी प्रसारमाध्यमांमध्ये झळकत होते. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितले होते. तसेच सायंकाळी फेसबुक लाईव्हद्वारे बोलतानाही उद्धव यांनी आपल्याला कोरोना झाल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री रात्री लोकांमध्ये मिसळल्याने त्यांच्याविरोधात कोरोना नियमांचा भंग करत लोकांची भेट घेतली अशी तक्रार तेजिंदर पाल सिंह यांनी दिली. ऑनलाइन पद्धतीने मलबार हिल पोलिस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल केली आहे. तेजिंदर पाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार दाखल केल्याची माहिती दिली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची  क्विक अँटिजन टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. पण आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना कोरोना झाला की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला. काही काळानं पुन्हा एकदा आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. त्यानंतरच ते पॉझिटिव्ह आहेत की नाही याबाबत चित्र स्पष्ट होईल.

 

 

First Published on: June 22, 2022 11:09 PM
Exit mobile version