काँग्रेसकडून लोकसभेची तयारी; पटोलेंच्या अध्यक्षतेखाली उद्या होणार मतदारसंघनिहाय बैठक

काँग्रेसकडून लोकसभेची तयारी; पटोलेंच्या अध्यक्षतेखाली उद्या होणार मतदारसंघनिहाय बैठक

लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections 2024) तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने (Congress) टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ आणि ३ जून रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून बैठकीला राज्यातील प्रमुख नेते आणि सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

२ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बैठकीला सुरुवात होत असून पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग रत्नागिरी, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, दिंडोरी, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ वाशिम, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, भंडारा गोदिया, वर्धा, नागपूर, रामटेक व पालघर या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. तर ३ जून रोजी पुणे, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सोलापूर, माढा, बारामती, शिरुर, मावळ, रायगड, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड, ठाणे, भिवंडी व कल्याण या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाचे सर्व माजी मंत्री, विधान परिषद गटनेते सतेज पाटील तसेच प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य उपस्थित असतील. तसेच लोकसभा मतदार संघातील प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्ष उपस्थित राहतील.

शहरांची नावं बदलण्याचे काम सुरु – नाना पटोले

शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली, त्याचे काँग्रेस पक्ष स्वागतच करत आहे. पण मुळात या सरकारकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून शहरांची नावं बदलण्याचे काम सुरु आहे. शहराचे नाव तर बदलले पण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या पद्धतीने समाजकार्य केले, सर्वधर्म समभावाला घेऊन पुढे गेल्या, त्या विचारांवर शिंदे-फडणवीस सरकारने काम करावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा : Adani Pawar meet: उद्योगपती गौतम अदानी पवारांच्या भेटीला ‘सिल्व्हर ओक’वर


 

First Published on: June 1, 2023 9:30 PM
Exit mobile version