धक्कादायक : रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला

धक्कादायक : रुग्णालयातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला

कोरोनाचा विळखा औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत आहे. त्यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. औरंगाबादच्या गणेश नगर येथील ३८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी साडेचारच्या सुमारास घडली आहे. या रुग्णावर घाटी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान, आज, मंगळवारी त्यांनी पहाटे धूम ठोकली आहे.

सुरक्षा रक्षक असतानाही झाला फरार

घाटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक होते. मात्र, ते असताना देखील सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन कोरोनाबाधित रुग्ण पळून गेल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. त्या रुग्णाविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले आहे.

राज्यात २४ तासांत १०९ जणांचा बळी

राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज कोरोनामुळे १०९ जणांचे बळी गेले आहेत. तसेच एका दिवसात २ हजार ५५३ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा ३ हजार १६९ वर पोहोचला असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ झाला आहे. तसेच एका दिवसात १ हजार ६६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत राज्यात एकूण ४० हजार ९७५ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – Corona Live Update: राज्यात २४ तासांत १०९ जणांचा बळी


First Published on: June 9, 2020 9:25 AM
Exit mobile version