गोपीनाथ मुंडेंचे विचार पुढे नेण्याचे कसब धनंजय मुंडेतच – शरद पवार

गोपीनाथ मुंडेंचे विचार पुढे नेण्याचे कसब धनंजय मुंडेतच – शरद पवार

गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा वारसा धनंजय मुंडे चालवत असल्याचे शरद पवार म्हणाले.

“गोपीनाथ मुंडेंनी अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन अनेक वर्ष राजकारण केले. तेच काम आता मोठ्या नेटाने पुढे घेऊन जाण्याचे काम विरोधी पक्षात कोण करत आहे, असे बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला विचारले तर तुम्हाला कोणीही सांगेल की, गोपीनाथ मुंडेच्यानंतर धनंजय मुंडे हे समर्थपणे काम करत आहेत”, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवने यांच्या प्रचारासाठी आष्टी येथील जाहीर सभेत बोलत होते.

बीड जिल्ह्यातील जनता प्रगल्भ आहे. आपल्यासाठी तळमळीने काम कोण करते हे त्यांना चांगलेच कळते. लोकसभेच्या प्रचारात पंकजा मुंडे या आम्हीच गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आणि विचार पुढे घेऊन जात असल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र, गोपीनाथ मुंडे यांचे विचार, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे कसब धनंजय मुंडे यांच्यात आहे, असे प्रतिपादन शरद पवार यांनी सभेत बोलताना केले.

मी सत्ताधारी पक्षाचा मंत्री होतो. तेव्हा गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षात होते. अनेक वेळा आमची शाब्दिक चकमकही झाली. मात्र, व्यक्तिगत संबंध कधीच बिघडले नाहीत. त्यांच्या निधनानंतर आम्ही बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार द्यायचा नाही, असे ठरवले होते. ही गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलची आमची श्रद्धा होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू असलेल्या शिष्यवृत्तीला आम्ही २५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे पवार म्हणाले.

बीड जिल्हा कष्टकऱ्यांचा सन्मान करणारा जिल्हा आहे. म्हणूनच बजरंग सोनवणे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन एका प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. हा जिल्हा नक्कीच बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

First Published on: April 14, 2019 8:16 PM
Exit mobile version