दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आता मराठवाड्याचा पाणीप्रश्न पेटला आहे. जायकवाडीमध्ये वरच्या धरणातून पाणी सोडण्यावरून आता वाद टोकाला गेला आहे. जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याच्या प्रश्नावरून आता नाशिकचे लोकप्रतिनिधी कोर्टात गेले आहेत. तर, नगरचे शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. यानंतर सावध पवित्रा घेत जलसिंचन विभागानं पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. औरंगाबादमधील जायकवाडी धरणामध्ये पाण्याचा साठा कमी आहे. परिणामी, समन्यायी वाटपाप्रमाणे पाणी द्या, असे आदेश जलप्राधिकरणानं दिले आहेत. तर, नाशिक जिल्ह्यामध्ये देखील दुष्काळ आहे. त्याच मुद्याला धरून नाशिकचे लोकप्रतिनिधी न्यायालयात गेले आहेत. तर नगरच्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर, जायकवाडीतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरच्या धरणातून किती पाणी येतं यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती जलसिंचन विभागानं दिली आहे.
वाचा – मुख्यमंत्र्यांकडून राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा
राज्यात दुष्काळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा केली आहे. मंगळवारी राज्यमंत्री मंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. त्यानुसार सरकार आता या १८० तालुक्यांमध्ये आठ उपाययोजना राबवणार आहे. या दुष्काळग्रस्त तालुक्यांची पाहणी केंद्र सरकारचे पथक करणार आहे. त्यानंतर मदतीची घोषणा करण्यात येणार आहे. सरकारच्या आठ उपाययोजनेमध्ये टॅंकर, चारा, वीज, विद्यार्थ्यांना शिक्षण, चारा छावण्या यांचा समावेश आहे.
पावसानं ओढ दिल्यानं राज्यात सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पिकं देखील करपू लागले आहेत. त्यात परतीच्या पावसानं ओढ दिल्यानं बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. आता पुढच्या वर्षी मान्सूनपर्यंत दिवस कसे काढायचे हाच यक्ष प्रश्न बळीराजाला पडला आहे.