‘जायकवाडी’तून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता, स्थानिकांना सतर्कतेचा इशारा

‘जायकवाडी’तून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता, स्थानिकांना सतर्कतेचा इशारा

राज्याच्या अनेक भागांत पावसाने तुफान बॅटींग केली आहे. जोरदार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अशातच आता मराठवाड्यासाठी महत्त्वाचे असलेल्या जायकवाडी धरणातील पाण्यासाठ्यात वाढ होत आहे. ही वाढ पाहता केव्हाही धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे गोदावरी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Due To Heavy Rain Jayakwadi Dam Water Will Released To Godavari River)

जालना जिल्ह्यात असलेल्या अंबड व घनसावंगी तालुक्यातील अनेक गावे ही गोदावरी काठावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, सध्या स्थितीला धरणामध्ये ७३.९७ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, येत्या काळात पावसाची संततधार कायम असल्यास पाणीसाठ्यात वाढ होऊ शकते.

सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर आता मराठवाडा आणि विदर्भात देखील जोर लावला आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होत असल्याने सध्या स्थितीला धरणामध्ये ३६ हजार ३०२६ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. धरणाचे (आर.एस.ओ) परिचलन सूचनानुसार आवश्यक असणारी पाणी पातळी नियमित करावी लागणार आहे. पाण्याची अशी आवक धरणामध्ये सुरू राहिल्यास नजीकच्या काळामध्ये जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.


हेही वाचा – …तर पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदाराही आले नसते, रामदास कदमांचा दावा

First Published on: July 19, 2022 3:29 PM
Exit mobile version