‘विद्यार्थी चळवळीला निवडणूकांमुळे मिळेल बळ ‘

‘विद्यार्थी चळवळीला निवडणूकांमुळे मिळेल बळ ‘

विनोद तावडे

विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित होण्याच्या दृष्टिने विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका महत्वपूर्ण असून या निवडणूकांमुळे विद्यार्थी चळवळीला बळ मिळेल, असा आशावाद राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. उच्च शिक्षण संचालनालय पुणे आणि मुंबई विद्यापीठाच्या सयुंक्त विद्यमाने आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, परिनियम समितीचे सदस्य प्राचार्य अनिल राव, शिक्षण तज्ज्ञ आनंद मापुस्कर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील कुलगुरू, कुलसचिव आणि प्राचार्य उपस्थित होते.

विद्यार्थ्यांकडे प्रचंड उर्जा असते

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही महाराष्ट्रात महाविद्यालयीन निवडणूका होत नव्हत्या. मात्र, राज्य सरकारने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणूकांमधून खऱ्या अर्थाने नेतृत्वाची संधी मिळावी. तसेच लोकशाही मार्गाने सार्वत्रिक मतदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कॅम्पसवर विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यास वाव मिळावा यासाठी राज्यशासनाच्या वतीने विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकीचे एकरुप परिनियन तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकांमुळे नेतृत्वगुण विकासाला चालना मिळणार आहे. उमेदवार विद्यार्थ्यांना आपल्या मतदारांसमोर स्वतःची भूमिका मांडावी लागेल. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटीबद्ध असणारे विद्यार्थी मंडळ तयार होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांकडे प्रचंड उर्जा असते. ही उर्जा योग्य रितीने वापरली गेल्यास खूप सकारात्मक बदल घडू शकतो, असेही त्यांनी नमुद केले. त्यांनी यासाठी त्यांचा पंढरपूरच्या वारीतील अनुभव विशद करताना शिस्त आणि स्वच्छता राखण्यासाठी मदत करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हजारो स्वयंमसेवकांचा आवर्जून उल्लेख केला. विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकांमधून विद्यार्थी विकासाकडे सर्वांनी लक्ष देण्याचे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी केले आहे.

कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर यांनी विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकातून तरुणांतील नेतृत्व गुण विकासाला चालना मिळणार असून देशाच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या निवडणूकांकडे शिक्षणाचा एक भाग म्हणून पाहावे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषण करतांना राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका घेण्यामागची पार्श्वभूमी विशद करुन अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन प्रत्येक विद्यापीठांनी सलंग्नित महाविद्यालयांसाठी विद्यापीठ स्तरावर करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.

रेग्युलेटरी फ्रेमवर्क ऑफ इलेक्शन

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘रेग्युलेटरी फ्रेमवर्क ऑफ इलेक्शन’ या विषयावर प्राचार्य अनिल राव यांनी मार्गदर्शन केले. या सत्रात प्राचार्य राव यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील निवडणूकांसदर्भातील तरतूदी संबंधी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात शिक्षणतज्ज्ञ आनंद मापुस्कर यांनी ‘प्रोसेजिअरल अस्पेक्ट ऑफ इलेक्शन’ या विषयांवर मार्गदर्शन केले. यामध्ये निवडणूकांसाठीची पात्रता, मतदार यादी, निवडणूक पद्धती विषयी आनंद पुस्कर यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक कुलगुरू डॉ. डी.टी शिर्के यांनी टाईमलाईन फॉर ईलेक्शन प्रोग्राम या विषयावर मार्गदर्शन केले.


हेही वाचा – अनिल देशमुख तेव्हा झोपला होतात का? विनोद तावडेंचा पलटवार

हेही वाचा – कोचिंग क्लास मालक आणि विनोद तावडे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण – अनिल देशमुख


 

First Published on: June 10, 2019 7:49 PM
Exit mobile version