भारत जोडो यात्रेकरूंसाठी नांदेड जिल्ह्यात अंथरला फुलांचा सडा

भारत जोडो यात्रेकरूंसाठी नांदेड जिल्ह्यात अंथरला फुलांचा सडा

पार्डी (जिल्हा नांदेड ) : नांदेड जिल्ह्यातील सेनी (ता. अर्दापूर) येथील ग्रामस्थांनी दोन क्विंटल फुलांचा सडा कित्येक फूट शिंपून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे खास स्वागत केले. त्यांच्या या अनोख्या स्वागताने मार्गावरून निघालेले हजारो यात्रेकरूही सुखावून गेले. नांदेड जिल्ह्यातील अभूतपूर्व गर्दी, लोकांचा उत्साह आणि सहभागानंतर सायंकाळी यात्रेने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला.

‘देशाचे संविधान वाचवण्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी, आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी राहुल गांधी कन्याकुमारी काश्मीर पर्यंत पदयात्रेस निघाले आहेत. त्यांच्याबद्दल सन्मान व्यक्त करण्यासाठी आम्ही ही फुले अंथरली आहेत. ही फुले नाहीत तर त्या आमच्या भावना आहेत, असे सेनीचे रहिवासी शंकर राजाराम शिंदे यांनी सांगितले. त्याच्याच पुढे काही ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याच्या आकारातील फुलांच्या आकर्षक प्रतिकृतीद्वारे राहुल गांधींचे स्वागत केले.

सकाळच्या सत्रात प्रचंड गर्दी उसळलेल्या नांदेड – हिंगोली मार्गावर आजूबाजूच्या 50 किलोमीटर अंतरावरील खेड्यापाड्यातुन आलेले अनेक ग्रामस्थ जागोजागी रस्त्याच्या कडेला समूहाने उभे होते. तसेच वेगवेगळे प्रश्न घेऊन लोक यात्रा मार्गावर राहुलजी सोबत चालण्यासाठी आले होते.

‘वन रँक वन पेन्शन’ची मागणी घेऊन मुदखेड येथील 22 माजी सैनिक रस्त्याच्या कडेला जोरजोरात घोषणा देत उभे होते. “आमची ही मागणी केवळ काँग्रेसच पूर्ण करेल,” असा आमचा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही राहुलजींना पाठिंबा द्यायला आलो आहोत, असे माजी सैनिक साहेबराव होने यांनी सांगितले. नऊ वर्षाचा नागेश गजानन नर्डीले मोरपिसांचा गुच्छ घेऊन बाबांसोबत स्वागतासाठी आला होता. तर हिमायतनगरहुन असंख्य महिलाचा समूह दाखल झाला होता.


कॉम्प्युटर पाहिला नाही, पण सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचं स्वप्न; राहुल गांधींनी मुलाला दिला मदतीचा हात

First Published on: November 11, 2022 4:48 PM
Exit mobile version