समस्यांच्या गर्तेत गणेशमूर्ती व्यवसाय

समस्यांच्या गर्तेत गणेशमूर्ती व्यवसाय

गणेश चित्र शाळा

गणेशोत्सव म्हटला की गणेश चित्र शाळांमध्ये मूर्त्या बनवण्याची लगबग सुरू होते.त्यामुळे गणेशोत्सवाला दीड महिन्यांचा कालावधी उरला असताना तालुक्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती तयार करणार्‍या कार्यशाळांतून लगबग सुरू झाली आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कामाचा वेगही वाढला आहे.

परंतु, वाढत्या महागाईमुळे यंदा पुन्हा एकदा गणेशमूर्तींच्या किमतीत वाढ होणार असल्याने भक्तांना त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. याचीच सुरूवात म्हणजे मूर्ती बनविण्यासाठी लागणार्‍या शाडू मातीच्या किमतीत अगोदरच दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.तसेच प्लास्टर ऑफ पॅरिससह रंग व अन्य साहित्यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. तसेच मजुरीच्या दरातही वाढ झाली असली तरी मजूर मिळणे मुश्कील झाले आहे. सतत पडणारा पाऊस, त्यात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अशा अनेक समस्यांच्या गर्तेत हा व्यवसाय सध्या सापडला आहे. केवळ कलेची असलेली आवड जोपासण्यापुरताच हा व्यवसाय उरला असल्याची व्यथा मूर्तिकार अच्युत चव्हाण यांनी ‘आपलं महानगर’शी बोलून दाखविली.

शाडूच्या मूर्त्या वाढल्या पण…

शहरासह तालुक्यात साठ ते सत्तर गणेशमूर्ती कार्यशाळा असून, माती मळण्यापासून ते रंगकामापर्यंतची सर्व कामे अनेक मालकांना स्वतःसह कुटुंबियांना सोबत घेऊन करावी लागतात. आधुनिक तरुणाई या व्यवसायात येण्यास फारशी उत्सुक नसताना दुसरीकडे चांगले कलाकार कामगार मिळणेही दुरापास्त झाले आहे. त्यामुळे कामासाठी आलेल्या निष्णात कारागिराला घसघशीत मजुरी देणे भाग पडत आहे. शाडूच्या मातीपासून बनविण्यात येणार्‍या मूर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पर्यावरणपूरक या मूर्तींना मागणीही जास्त आहे.

First Published on: July 22, 2019 4:53 AM
Exit mobile version