पडळकरांचा ताफा पोलिसांनी अडवला, चौंडीमध्ये पडळकर समर्थक अन् पोलिसांत खडाजंगी

पडळकरांचा ताफा पोलिसांनी अडवला, चौंडीमध्ये पडळकर समर्थक अन् पोलिसांत खडाजंगी

पुणेः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चौंडी येथे दाखल झाल्यानंतर तिथे मोठा गोंधळ उडालाय. विशेष म्हणजे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हेसुद्धा चौंडी यात्रेसाठी जात असता त्यांचा ताफा पोलिसांकडून अडवण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस आणि पडळकर समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. एकच छंद गोपीचंदच्या घोषणेनं पडळकरांच्या समर्थकांनी परिसर दणाणून सोडलाय. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत चौंडीला जात असतानाही हा सर्व प्रकार घडलाय. विशेष म्हणजे त्यानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे.

दोन्ही पवारांनी अहिल्यादेवींच्या चौंडीमध्ये गलिच्छ पद्धतीने राजकारण केल्याबद्दल जाहीर निषेध : पडळकर

मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. शरदचंद्र पवार आणि त्यांचा नातू रोहित पवार या दोघांनीही अहिल्यादेवींच्या चौंडीमध्ये गलिच्छ पद्धतीने राजकारण केल्याबद्दल मी आपल्या माध्यमातून जाहीर निषेध करतो. मी यात्रेवर ठाम आहे, पोलीस प्रशासनाशी आम्ही कुठल्याही चुकीच्या पद्धतीने वागलेलो नाही. आज आमची यात्रा अहिल्यादेवींच्या चौंडीमध्ये जाण्यापासून कशासाठी अडवताय. यात तुमचा हेतू काय आहे. त्यांची तिकडे सभा आहे, त्या सभेला परवानगी द्यायला पाहिजे नव्हती, कोण शरद पवार? आज त्यांचं वय 82 ते 83 आहे, त्यांना कधी जयंती दिसली नाही. आज नातवाला लाँच करण्यासाठी आमच्या अहिल्यादेवी धर्मस्थळाचं, आमच्या प्रेरणास्थळाचं राजकारण करू पाहताय. मी त्यांचा जाहीर निषेध करतो. मल्हारराव होळकर हे मुघलांच्या छाताडावरती नाचले होते, यशवंतराव होळकरांनी इंग्रजांना चिरडून काढलं होतं, याची आठवणही गोपीचंद पडळकरांनी पवारांना करून दिलीय.

यापूर्वीसुद्धा काँग्रेसचे सगळे नेते हे दरवर्षी न चुकता चौंडीला जात होते : दिलीप वळसे पाटील

दुसरीकडे या सर्व प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनीही प्रतिक्रिया दिलीय. यापूर्वीसुद्धा काँग्रेसचे सगळे नेते हे दरवर्षी न चुकता चौंडीला जात होते. मीसुद्धा अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना न चुकता दरवर्षी जात होतो. यावर्षी रोहित पवारांच्या आग्रहावरून पवारसाहेबांना बोलावलं. पवारसाहेब तिथे गेले, त्यात काही चुकीचं नाही. पोलिसांना जी बंदोबस्ताची जबाबदारी दिलेली असते, त्यांच्या आकलनाप्रमाणे जेवढी आवश्यक तेवढी पोलीस फोर्स त्या ठिकाणी तैनात केली आहे, असंही दिलीप वळसे पाटील म्हणालेत.


हेही वाचाः Sanjay Raut : राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न, संजय राऊतांचा

First Published on: May 31, 2022 12:32 PM
Exit mobile version