कोकणातील हापूस आंब्यांची मुंबई, ठाण्यातील मॉलमध्ये होणार विक्री

कोकणातील हापूस आंब्यांची मुंबई, ठाण्यातील मॉलमध्ये होणार विक्री

कोकणातील हापूस आंब्यांची मॉलमध्ये विक्री होणार आहे. मुंबई, ठाण्यातील मॉलमध्य विक्री होणार असून, शेतकरी स्वत: विक्री करणार आहेत. त्यामुळं कोकणातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हापूस आंब्याचा ‘लोकल ते ग्लोबल’ ब्रँड विकसित करत शेतकर्‍यांना व्रिकीसाठी नवीन बाजारपेठ उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’तर्फे गेल्या २० वर्षांपासून विविध संकल्पना राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून या वर्षी २२ एप्रिल ते १५ मे दरम्यान ‘मँगो फ्ली’ उपक्रम राबविण्यात येणार असून या अंतर्गत कोकणच्या शेतातील अस्सल हापूस आंबा थेट मुंबई, ठाण्यातील मॉल्समध्ये विक्रीस उपलब्ध होणार आहे.

रत्नागिरी, पावस, मालवण, राजापूर, विजयदुर्ग, देवगड, कुणकेश्वर आदी भागातील हापूसचे प्रत्येक मॉल्समध्ये १० स्टॉल्स लावण्यात येणार असून खुद्द शेतकरी यांची विक्री करणार आहेत. या माध्यमातून ३५० हून अधिक शेतकर्‍यांना व्यासपीठ उपलब्ध होणार असून ग्राहकांना नैसर्गिकरित्या पिकवलेले, कोणतीही भेसळ नसलेले आणि जीआय मानांकन प्राप्त हापूसचा आस्वाद घेता येणार आहे.

”आंबा विक्रीसाठी शेतकर्‍यांनी बाजारपेठेतील व्यापार्‍यांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनावे, त्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध व्हावी, परिश्रमाचा योग्य आर्थिक मोबदला मिळावा या दृष्टीने आम्ही विविध संकल्पना राबवत असतो. आंब्याची ऑनलाईन विक्री, शेतकरी ते थेट ग्राहक या योजनेनंतर या वर्षी शेतकर्‍यांना शहरातील मॉल्समध्ये आंबा विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.” असे ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’चे संस्थापक संजय यादवराव यांनी म्हटलं.

‘आय लीफ कनेक्ट’च्या सहकार्यानं आयोजित ‘मँगो फ्ली’ अंतर्गत आंब्याची विक्री, मँगो कॅफे आणि सोबत लाईव्ह मनोरंजन…असा परिपूर्ण उपक्रम पार पडणार आहे. ‘रिजनल फूड्स’चे सह संस्थापक आणि सेलिब्रिटी शेफ सनी पावसकर यांनी आंब्यापासून बनवलेल्या विविध स्वादिष्ट पदार्थांचा यावेळी आस्वाद घेता येईल. ”बदलत्या काळानुसार आंबा महोत्सवाचे रूप बदलत या महोत्सवाला अधिक उत्साहपूर्ण बनवत मनोरंजन, फोटोग्राफी तसेच मँगो कॅफेची जोड देत आगळ्यावेगळ्या वातावरणात साजरा करण्यावर आमचा भर आहे. जेणेकरून सर्व ग्राहकांसाठी हा महोत्सव एक पर्वणी ठरेल.” असे ‘आयलीफ कनेक्ट’चे संस्थापक प्रतिश आंबेकर यांनी म्हटलं.

येत्या काही दिवसात ‘ग्लोबल कोकण’तर्फे ‘शेतकरी आंबा बाजार’चे महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये आयोजन करण्यात येणार असून एकूण २०० स्टॉल्स लावले जातील. मुंबई-गोवा, मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक आदी महामार्गांवर याचे आयोजन केले जाईल. हे दोन्ही उपक्रम मिळून १०००हून अधिक शेतकऱ्यांना व्यासपीठ मिळणार आहे. अहमदाबाद आणि नाशिक महामार्ग येथील आंबा बाजारच्या नियोजनात ‘समृद्ध कोकण शेतकरी संघटना’, ‘जिजाऊ सामाजिक संस्था’चे संस्थापक निलेश सामरे आणि त्यांच्या महिला बचत गटांच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी https://www.globalkokan.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.

‘मँगो लीफ’ उपक्रम कुठे आणि कधी?


हेही वाचा – माहुल व मोगरा पंपिंगचे काम झाल्यावर मुंबई पूरमुक्त होणार : महापालिका आयुक्त

First Published on: April 14, 2022 6:47 PM
Exit mobile version