Heavy Rain : मराठवाड्याला अवकाळी पावसाचा फटका; ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट

Heavy Rain : मराठवाड्याला अवकाळी पावसाचा फटका; ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ; सात तासांत सरासरी 47.88 मिमी पाऊस

महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे सर्वसामान्यांपासून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आज सकाळपासून या अवकाळी पावसाने मराठवाड्याला चांगलंच झोडपून काढलं. भरदुपारी 12 वाजताच्या सुमारास ढगाळ वातावरण झाल्याने संध्याकाळ झाल्याचा आभास मराठवाड्यातील नागरिकांना होत होता. या ढगाळ वातावरणानंतर विजांच्या कडकडाटात पावसाने झोडपून काढले. उन्हाळ्यातला हा पावसाळा पर्यावरण बदलाचा तडाखा असल्याची भीती व्यक्त होतेय.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात गारपीट आणि जोरदार वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आलेला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर तसेच विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अकोला, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Heavy Unseanal Rain In Marathwada Maharashtra Rain Updates)

राज्यात आज (28 एप्रिल) मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपिट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, यलो अलर्ट मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ पुणे या भागात देण्यात आला आहे. गुरुवारी खान्देशातील जामनेर, पाळध याठिकाणी गारपिटीचा पाऊस झाला. दरम्यान, येत्या पाच ते सहा मेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असाच जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे,

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दुपारी 12 वाजताच अंधारुन आले होते. वातावरणाचा बदललेला नूर पाहून सर्वांनीच पाऊस पाहण्यासाठी गर्दी केली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात पाऊस धो-धो कोसळत असल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. खान्देशात काल गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. आजही हवामान विभागाने राज्यातील विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यासह मराठवाड्यावर भर उन्हाळ्यात अवकाळीचे काळे ढग पुन्हा घोंगावत आहेत. आजपासून 30 एप्रिलपर्यंत मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे.


हेही वाचा – बारसूवरुन शिवसेनेत मतमतांतरे, राजन साळवींचा प्रकल्पाला पाठिंबा – अजित पवार

First Published on: April 28, 2023 8:13 PM
Exit mobile version