नाशिक : औरंगाबाद रोडवरी बस दुर्घटनेनंतर नाशिक शहर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी बुधवारी (दि.१२) शहरातील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांची पोलीस आयुक्तालयात बैठक घेत सूचना दिल्या. नाशिक जिल्ह्यात एकही जीवघेणा अपघात व्हायला नको. सुरक्षाविषयक नियमांना डावलून जादा प्रवासी वाहतूक करणार्या खासगी बस जप्त केल्या जातील, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना दिला.
नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिर्ची हॉटेल चौकात शनिवारी (दि. ८) झालेल्या ट्रक-खासगी बसच्या भीषण अपघातात १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी बुधवारी (दि.१२) नाशिक शहरातील खासगी ट्रॅव्हल व्यावसायिकांची बैठक घेतली. यावेळी पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, महापालिकेच्या अधिकार्यांसह सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना सुरक्षाविषयक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ‘बसचालकाने जादा प्रवासी बसवले, तर येथे तक्रार करा’, असे बसच्या मागे लिहीतात का? अपघातानंतर विचारमंथन केले जाते. दोषींवर कारवाई होते. आता तसे होणार नाही. नाशिकचे रस्ते, वाहतूक सुरक्षित झाली पाहिजे. बसचालकांना वाहतुकीचे प्रशिक्षण द्या. ‘ब्लिंकर’ चौकात वेगमर्यादेचे पालन का नाही होत, प्रवाशांना बस लवकर पोहोचवण्याचे आमीष दखवू नये, व्यावसायिक फंडे प्रवाशांच्या जीवावर बेतत आहेत. खासगी बसला रस्त्यात प्रवासी भरण्यास परवानगी नाही. त्यासाठी एसटी आहे, असे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी बस व्यावसायिकांना सांगितले. यावेळी बस व्यावसायिकांनी विविध प्रश्न उपस्थित करत वाहतूक नियमांचे पालन केले जाईल, असे व्यावसायिकांनी सांगितले.
तर होईल कारवाई
- क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक
- जादा भाडे आकारणी
- टप्पा वाहतूक केल्यास
- वाहनांमधील बेकायदा फेरबदल
- बसमधून बेकायदा मालवाहतूक
- परवान्यांच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे
ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे प्रश्न
सरकारी बसचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का. कार्यालयाच्या आवारातून बस गेल्यानंतर चालक टप्पा वाहतूक करत प्रवाशांकडून पैसे घेतात. त्यामुळे व्यावसायिकांवर कारवाई का केली जाते. महापालिका खासगी बससाठी पार्किंग सुविधा देत नाही. परिणामी, मिळेल त्या ठिकाणी बस पार्क कराव्या लागतात. ट्रक टर्मिनलप्रमाणे खासगी बससाठी जागा द्यावी. रात्रीच्यावेळी बायपासवर वेगमर्यादाचे उल्लंघन होते. या ठिकाणी गतीरोधक व रॅम्प बसावावेत, असे बस व्यावसायिकांनी बैठकीत पोलिसांना सांगितले.
सुरक्षेची हमी देणार का ?
खासगी बससाठी प्रवाशी क्षमत ३० जणांची आहे. रस्ते अपघातात सरकारी बसचा अपघात झाला तर प्रवाशांना शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. जर खासगी बसचा अपघात झाला तर मृत प्रवाशांच्या वारसांना व जखमी प्रवाशांना बस व्यावसायिक आर्थिक मदत करतात. जर शासनाकडून प्रवाशांना मदत केले जाते तर बस व्यावसायिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
पोलीस आयुक्तांसोबत ट्रॅव्हल्स बस संचालकांची बैठक झाली. बसमध्ये जादा प्रवासी घेवू नये. आहे. जादा प्रवासी बसमध्ये आढळल्यास बस जप्त केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. त्यास ट्रॅव्हल्स संचालकांनी प्रतिसाद दिला आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल्स बसचालक व कार्यालयातील कर्मचार्यांना रस्ता सुरक्षेसह नियम पाळण्यास सांगणार आहे. : दिलीपसिंह बेनीवाल, अध्यक्ष, ऑल इंडीया टुरिझम अॅण्ड ट्रान्सपोर्ट असोसिएशन