नरेंद्र मोदींच्याच हातात देश सुरक्षित

नरेंद्र मोदींच्याच हातात देश सुरक्षित

सोलापूर विजयी संकल्प मेळाव्यात रावसाहेब दानवेंचा विश्वास

आज देशात भयानक युद्धजन्य परिस्थिती आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आता देश सुरक्षित राहू शकतो अशी तमाम देशवासीयांची भावना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि मोदींचे हात बळकट करा असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

सोमवारी हेरिटेज येथे महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे बोलत होते. दानवे म्हणाले, राज्यात युती अभेद्य आहे ती कोणीसुद्धा मोडू शकणार नाही हे कोल्हापुरातील विराट महामेळाव्याने दाखवून दिले आहे. करवीर नगरीच्या महालक्ष्मीने आशीर्वाद दिला आहे. महालक्ष्मीच्या साक्षीने राज्यात महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येऊन देशात पुन्हा युतीची सत्ता येऊन पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील. आज देशामध्ये भयंकर युद्धजन्य परिस्थिती आहे. अतिरेक्यांनी सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी संयमाने सर्व परिस्थिती हाताळत करारी जवाब दिला आहे. ४० सैनिकांच्या बदल्यात ३०० अतिरेक्यांचा खात्मा केला हे फक्त मोदीच करू शकले. त्यामुळे मोदींच्या हातीच देश सुरक्षित राहणार आहे, अशी भावना देशवासीयांमध्ये आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

यापूर्वीच्या सरकारने सर्व क्षेत्रात सुमार कामगिरी केली आहे. दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यासाठी लावलेले निकष बदलण्याची मागणी आम्ही अनेकदा केली मात्र त्यांनी दाखल घेतली नाही. मात्र, आमची सत्ता येताच आणेवारीची पद्धत बदलत शेतकर्‍यांना लाभ मिळवून दिला आहे. शासनाच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली . नुसती आश्वासने न देता ती कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पंतप्रधानांनी केले या विकासकामांच्या जोरावरच मते मागत आहोत. त्यामुळे जनता विकासरूपी महायुतीच्या पाठीशी राहील, असा विश्वासही दानवे यांनी बोलून दाखविला.

First Published on: March 26, 2019 4:07 AM
Exit mobile version