महापालिकेचे सर्वांसाठी पाणी धोरण; आता ‘त्या’ झोपडपट्टीत व इमारतींनाही पाणी पुरवठा

महापालिकेचे सर्वांसाठी पाणी धोरण; आता ‘त्या’ झोपडपट्टीत व इमारतींनाही पाणी पुरवठा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पालिकेने ‘सर्वांसाठी पाणी’ धोरण बनवले आहे. या धोरणाच्या अंतर्गत पालिकेच्या विविध जाचक नियमांमुळे ओसी नसलेल्या इमारतींना, झोपडपट्टीतील घरांना खासगी जमिनीवरील अघोषित झोपडीधारक, तटीय नियमन क्षेत्रात अर्थात सीआरझेड परिसरात राहणारे झोपडीधारक, सरकारी जमिनींवरील झोपडीधारक इत्यादींना देखील मानवीय दृष्टिकोनातून जल जोडणी दिली जाणार आहे.

महापालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी’ या धोरणाचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते ७ मे रोजी सायंकाळी ‘गोरेगांव पूर्व’ परिसरातील नागरी निवारा परिषदेच्या जवळ असणा-या ‘माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान’ या ठिकाणी करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका दररोज तब्बल ३८५ कोटी लीटर म्हणजेच ३ हजार ८५० दशलक्ष लीटर एवढ्या पाण्याचा पुरवठा मुंबईकरांना करते. हा पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबईत सध्या ४ लाख ६० हजार अधिकृत नळजोडण्या आहेत.

मात्र, असे असले तरी मुंबई महापालिकेच्या काही प्रचलित व पूर्वीच्या नियमांमुळे विविध प्रवर्गातील झोपडपट्टयांमध्ये राहणा-या रहिवाशांना नळजोडणी देता येत नसे. त्यामुळे अशा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आणि विशेष करुन महिला वर्गाला विविध अडचणींना सामोरे जावे लागत असे. ही बाब लक्षात घेऊन व मानवीय भूमिकेतून विविध प्रवर्गातील झोपडपट्टयांमध्ये व निवासी इमारतींमधील रहिवाशांनाही नळजोडणी मिळावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी ’ या धोरण बनवले असून त्याचा लाभ खा करून झोपडपट्टीतील नागरिकांना ज्यांना पाणी मिळत नव्हते त्यांना होणार आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मा. उप मुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम या खात्यांचे मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, वस्त्रोद्योग – मत्स्यव्यवसाय – बंदरे खात्यांचे मंत्री अस्लम शेख, पर्यटन, पर्यावरण मंत्रीआदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


हेही वाचा – मुंबईतील नाले सफाईच्या कामाची होणार पोलखोल, साॅफ्टवेअर ठेवणार कामांवर लक्ष

First Published on: May 6, 2022 9:38 PM
Exit mobile version