सोलापूर – कारखानदार अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. सकाळी साडेसहा वाजल्यापासून 4 कारखान्यांची तपासणी सुरु आहे. पंढरपूरचे मूळ रहिवासी असलेले अभिजीत पाटील हे मोठे प्रस्थ असून त्यांनी 4 साखर कारखाने विकत घेतले आहेत. तर विठ्ठल साखर कारखान्यावर त्यांचे पॅनेल निवडुन आले आहे.
अभिजीत पाटील पंढरपूरमधील एक बडे उद्योजक आहेत. या उद्योजकाने काही वर्षातच राज्यातील 4 खासगी साखर कारखाने विकत घेतले होते. अल्पावधीत साखर उद्योगातील ही प्रगती पाहून याबाबत कायमच उलट सुलट चर्चा सुरु होत्या. अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील 20 वर्षांपासून बंद पडलेला कारखाना चालवायला घेऊन गेल्या वर्षी तो यशस्वीपने चालवून दाखवला आहे.
विठ्ठल साखर कारखाना निवडणूकीत विजय –
पंढरपूर तालुक्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूकीत नुकताच अभिजीत पाटील यांच्या पॅनेलने विजय मिळवला होता. त्यांनी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके, कल्याण काळे आणि भाजप खासदार मुन्ना महाडिक यांच्या सारख्या दिग्गजांच्या पॅनल पराभूत केले. नवख्या उमेदवारांना घेऊन पाटील यांनी ही निवडणूक लढवली होती. त्यांच्याकडे उस्मानाबाद, नाशिक, नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यात 4 कारखाने आहेत. या विजयासह पाटील यांनी पाचवा कारखाना आपल्या हाती घेतला आहे.