Lok Sabha 2024 : तिकीट कापलेल्यांचे काय होणार? मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान

Lok Sabha 2024 : तिकीट कापलेल्यांचे काय होणार? मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान

तिकीट कापलेल्यांचे काय होणार? मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान

यवतमाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभेतून विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याऐवजी राजश्री पाटील यांच्या गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ घालण्यात आली. काल बुधवारी (ता. 03 एप्रिल) मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. ज्यानंतर आज गुरुवारी (ता. 04 एप्रिल) लगेच राजश्री पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Lok Sabha Election 2024 CM Eknath Shinde big statement regarding ticket holders)

विद्यमान खासदार भावना गवळी, हेमंत पाटील, कृपाल तुमाने आणि हेमंत गोडसे यांचा मुख्यमंत्र्यांनी पत्ता कट केला आहे. ज्यामुळे आता शिंदे गटातही मोठ्या प्रमाणात नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे. पण ज्यांना उमेदवारी मिळण्याची 100 टक्के शक्यता होती. त्यांनाच मुख्यमंत्र्यांनी डच्चू दिल्याने त्यांचे आता पुढे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु, तिकीट कापलेल्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महत्त्वाचे विदान करण्यात आले आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उमेदवारी न दिलेल्या उमेदवारांना शब्द दिला आहे.

हेही वाचा… Archana Patil : भाजप आमदाराची पत्नी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर

आज प्रसार माध्यमांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीच्या उमेदवारांचे फॉर्म भरुन आम्ही आलो आहोत. राजश्री पाटील यांनी फॉर्म भरला आहे. राजश्री पाटील या यवतमाळ वाशिमची लेक म्हणून तुमच्यासमोर आल्या आहेत. जे वातावरण पाहतोय त्यावरुन रेकॉर्डब्रेक विजय राजश्री पाटील मिळवतील याची खात्री आहे. माहेरच्या मायेने इथले सगळे मतदार लेकीला निवडून देतील यात मला काही शंका वाटत नाही. राजश्री पाटील या धडाडीच्या नेत्या आहेत. त्या धडाडीच्या वक्त्या आहेत. त्याचप्रमाणे त्या धडाकेबाज कामही करतात. त्यांना सगळ्या योजना लक्षात आहेत.

तसेच, हिंगोलीमध्ये चांगले काम सुरू आहे. यवतमाळ आणि हिंगोलीत महायुतीचे खासदार निवडून येतील यात शंका नाही. भावना गवळी यांनी चांगले काम केले आहे. आता भावना गवळी यांचे मार्गदर्शन राजश्री पाटील यांना मिळणार आहे. राजकारणात काही गोष्टी कराव्या लागतात. मात्र एकनाथ शिंदे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे, असे मुख्यमंत्र्यांकडून यावेळी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री तिकीट कापलेल्या नेत्यांना दिलेला हा शब्द कितपत पाळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : भिंवडीची जागा राष्ट्रवादी शरद पवारांनीच राखली; पंकजा मुंडेंना बजरंग सोनवणेंचे आव्हान

First Published on: April 4, 2024 9:52 PM
Exit mobile version