पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर धुळे दौरा अर्धवट सोडून नाना पटोले दिल्लीला जाणार

पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर धुळे दौरा अर्धवट सोडून नाना पटोले दिल्लीला जाणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर नाना पटोले हा दौरा अर्धवट सोडून आज सायंकाळी दिल्लीला जाणार आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत गेल्यानंतर राजकारण ढवळून निघालं असताना काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला नाना पटोले जाणार आहेत.

शरद पवार यांच्या दिल्लीतील हालचालीनंतर नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांना दिल्लीत बोलावलं आहे. राज्याच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन जाहीर झालं आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षाची निवड झालेली नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित करण्यासाठी दिल्ली जात असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं. मात्र, हे एकच कारण यामागे नसणार. कारण शरद पवार हे दिल्लीला गेल्यापासून राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते कमलनाथ आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर आता शुक्रवारी काँग्रेसची बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

First Published on: June 24, 2021 1:17 PM
Exit mobile version