कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोकणातील रत्नागिरी चिपळून या नुकसानग्रस्त भागातील आढावा घेण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे आज गुरूवारी या परिसराचा दौरा करणार आहेत. यावेळी नितीन राऊत या दौऱ्यात वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचा आढावा घेणार आहेत. अतिवृष्टीमुळे महावितरण आणि महापारेषणच्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. लोकांच्या घरापर्यंत वीज कशी द्यावी, मदत कशी पोहोचवावी यासाठी हा दौरा आहे. लोकांची सेवा करणे, ब्लॅंकेट, खाण्याच्या गोष्टी पुरवण्याचा कार्यक्रम आहे. बऱ्याच गोष्टी ८० टक्के पूर्ण केल्या आहेत, २० टक्के बाकी आहेत. सध्या ज्या ठिकाणी वीज सुरू झाली नाही अशा ठिकाणी सौर दिवेही पुरवित आहोत, असे डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
Maharashtra Energy Minister Dr. Nitin Raut will visit the Konkan region today to assess the damage caused due to floods
80% of power restoration work has been completed. We are also providing solar lamps at places where power is yet to be restored, he says pic.twitter.com/780Wy8pyNH
— ANI (@ANI) July 29, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्याभरात झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील १९२७ गावे व शहरातील ९ लाख ६० हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. या सर्व पूरग्रस्त भागात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसामध्ये व पूरात साडेसहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. महवितरच्या कर्मचाऱ्यांकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. चिपळूण परिसरात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांसोबतच महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणेचे देखील मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण मधील अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले आहेत. अशा परिस्थितीतही नदीला आलेल्या पुराचा सामना करत, डोंगर दऱ्यांतून अवजड पोल, रोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
मनोधैर्य वाढविण्यासाठी आजचा दौरा
लोकांची सेवा करणे, त्यांना मदतीचा हात देणे, हे सुद्धा काम माझ्या खात्याच्या वर्कर्स युनियनने सुद्धा हाती घेतलं आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी सगळे कामाला लागले आहेत. मला वाटतं की बऱ्याच गोष्टी ८० टक्के आम्ही पूर्ण केल्या आहेत. २० टक्के कामं राहिली आहेत, परंतु हे काम करत असताना जे आमचे तांत्रिक कर्मचारी आणि अधिकारी होते, त्यांना आपल्या जीवाची बाजी लावावी लागली. अनेकदा भरपावसात त्यांना कसरत करावी लागली आणि अशा प्रसंगी त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी माझा हा दौरा असल्याचे डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले आहे.